जम्मू-काश्मीरमधील सीमा सुरक्षा दलाच्या छावणीवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या जवानांना गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शाबासकीची थाप दिली आहे. ते म्हणाले,की मी स्वत: सीमा सुरक्षा दल व केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या प्रमुखांशी श्रीनगर विमानतळाजवळील छावणीवर करण्यात आलेला हल्ला परतवण्यात आल्यानंतर बोललो. सुरक्षा दलांनी ही मोहीम अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडली त्याबाबत ते प्रशंसेस पात्र आहेत. या  हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचा सहायक उपनिरीक्षक हुतात्मा झाला आहे, तर इतर दोन जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती आता धोक्याच्या बाहेर आहे. विमानतळाजवळ तुंबळ धुमश्चक्रीत दोन दहशतवादी मारले गेले असून त्यामुळे काही काळ विमानतळावरील हवाई सेवा थांबवण्यात आली तसेच परिसरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या.