‘लज्जा’ या वादग्रस्त कादंबरीत आपण इस्लामवर टीका केलेली नाही तसेच इतर पुस्तकात इस्लामवर टीका केल्यामुळे मुस्लीम मूलतत्त्ववाद्यांनी आपल्या विरोधात फतवा जारी केलेला आहे, असे वादग्रस्त बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी येथे सांगितले.लज्जा कादंबरीत इस्लामवर टीका केल्याने आपल्या विरोधात फतवा जारी करण्यात आला या दोनही बाबी चुकीच्या आहेत. लज्जा कादंबरीत आपण इस्लामवर टीका केली नाही. इतर पुस्तकात इस्लामवर टीका केल्याने आपल्या विरोधात फतवा जारी करण्यात आला असे त्या म्हणाल्या. लज्जा हे निषेधाचे प्रतीक आहे. धर्माच्या नावाखाली हिंसाचार, द्वेष व लोकांना ठार मारणे हे प्रकार जगभर चालू आहेत असे लज्जा या कादंबरीच्या नवीन इंग्रजी आवृत्तीच्या प्रस्तावनेत नसरीन यांनी म्हटले आहे. लज्जा कादंबरीच्या नवीन आवृत्तीचे भाषांतर कार्यकर्त्यां-लेखिका अंचिता घातक यांनी केले आहे व त्याचे प्रकाशन पेंग्विन बुक्स इंडियाच्या वतीने करण्यात आले. नसरीन यांनी सांगितले की, त्या कादंबरीत जे प्रसंग वर्णन केले आहेत ते घडत राहतील, एखाद्या धर्माच्या लोकांचा दुसऱ्या धर्माच्या लोकांशी झगडा चालू राहील तोपर्यंत ही कादंबरी संदर्भहीन ठरणार नाही. लज्जा कादंबरीत धर्म व विद्वेष यावर भाष्य नाही तर त्यात मानवता व प्रेम याची चर्चा केली आहे.लज्जा या कादंबरीवर १९९३ मध्ये बांगलादेशात बंदी घालण्यात आली आहे, परंतु हे पुस्तक जगात जास्त लोकप्रिय ठरले आहे. तस्लिमा नसरीन यांनी इस्लामविरोधी मते व्यक्त केल्यामुळे त्यांना मुस्लीम मूलतत्त्ववाद्यांनी ठार मारण्याची धमकी दिली, त्यामुळे त्या १९९४ मध्ये बांगलादेशातून बाहेर पडल्या आहेत.