काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक तरुणाला जीपच्या समोर बांधणाऱ्या मेजर नितीन गोगोई यांच्या निर्णयाबद्दल सध्या देशभरात परस्परविरोधी मते व्यक्त होताना दिसत आहेत. या वादात आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीदेखील उडी घेतली आहे. तरूणाची ‘मानवी ढाल’ करण्याचा मेजर गोगोई यांचा निर्णय अनैतिक आणि अयोग्यच होता. या कृतीचे कदापी समर्थन करता येणार नाही, असे मत दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केले.

जम्मू काश्मीरमधील श्रीनगर मतदारसंघात गेल्या महिन्यात पोटनिवडणुकीदरम्यान सैन्याच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली होती. बडगाम जिल्ह्यात दगडफेकीपासून बचाव करण्यासाठी जवानांनी लष्करी जीपच्या पुढील भागावर फारुख अहमद दार युवकाला बांधून नेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सैन्याच्या या कृतीबद्दल अनेक मतमतांतरे पाहायला मिळत होती. मात्र, दिग्विजय सिंह यांनी ही कृती पूर्णपणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

दगडफेक करणाऱ्या तरूणांना नक्कीच निर्दोष म्हणता येणार नाही. मात्र, कोणत्याही सरकारच्या राजवटीत सैन्याने अशी कृती करणे पटण्याजोगे आहे का? या कृतीला नैतिक ठरवता येईल का? फारुख अहमद दार याचा मानवी ढालीसारखा वापर करायला तो दहशतवादी किंवा दगडफेक करणाऱ्यांपैकी होता का, असे अनेक सवाल दिग्विजय सिंह यांनी उपस्थित केले. फारूख पोटनिवडणुकीसाठी मतदान करायला गेला होता. त्यामुळे त्याचा मानवी ढालीसारखा वापर करण्याची सैन्याची कृती नैतिक किंवा योग्य नव्हती, असे सिंह यांनी म्हटले. तसेच काश्मीरमध्ये इतकी टोकाची परिस्थिती का निर्माण झाली आहे आणि त्याला जबाबदार कोण, याचा विचार झाला पाहिजे. यापूर्वी कधीही शाळकरी मुलींनी रस्त्यावर येऊन दगडफेक केली नव्हती, असे सांगत दिग्विजय सिंग यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान, भारतीय लष्कराकडून नितीन गोगोई यांना सन्मानित करण्यात आले आहे. घुसखोरीविरोधी मोहिमांमध्ये सातत्यपूर्ण प्रयत्नांसाठी लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी मेजर नितीन गोगोई यांना प्रशंसनीय सेवेचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.