पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका; विधानसभा प्रचार मोहिमेला सुरुवात

काँग्रेसची १५ वर्षांच्या कालावधीतील सत्ता आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राज्य सभेत आसामचे प्रतिनिधित्व करूनही आसाम विकासाच्या बाबतीत पिछाडीवर असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आसाममधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या मोहिमेला भाजपने सुरुवात केली. भाजप आणि त्यांचा नवा मित्र पक्ष बोडोलँड पीपल्स फ्रंट यांनी संयुक्त सभेचे आयोजन केले होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मतदारांशी संवाद साधला.

काँग्रेसला इतकी वर्षे सत्ता देऊनही त्यांना आसामचा विकास करता आलेला नाही. भाजपकडे सत्ता येताच आसामचा चेहरा बदलण्याला प्राधान्य दिले जाईल.

काँग्रेसची १५ वर्षे सत्ता असतानाही आसामसमोर समस्या का आहेत? असा सवाल उपस्थित करून मोदी म्हणाले की, मनमोहनसिंग यांनी राज्यसभेत या भागाचे प्रतिनिधित्व केल्यानंतरही या भागाचा विकास न होणे ही बाब दुर्दैवी आहे. येथील समस्यांची यादी मोठी असून कुठल्याही प्रकारचा विकास येथे झालेला नाही.

मोदी यांनी यावेळी आसाममधील काँग्रेस सरकार आणि मागील केंद्र सरकारवरही टीका केली. भाजप सरकारच्या कामगिरीवर सातत्याने प्रश्न उपस्थित करणाऱ्या काँग्रेसने आसाममध्ये काय केले? असा प्रश्नही मोदी यांनी केला. काँग्रेस पक्ष नागरिकांना गोंधळात टाकत आहे. काँग्रेसची १५ वर्षांतील सत्ता आणि भाजपची १५ महिन्यांची सत्ता यांमध्ये खूप फरक असल्याचेही मोदी यांनी यावेळी सांगितले.

आसाम विधानसभेची निवडणूक एप्रिल-मे महिन्यात होणार असून याचवेळी अन्य चार राज्यांतही निवडणूक होणार आहे.

ईशान्येकडील तरुणांना पोलीस भरतीत प्राधान्य

पंतप्रधान मोदी म्हणाले की, दिल्ली पोलीस भरतीसाठी ईशान्य भारतातील तरुणांना प्राधान्य देण्यात येणार आहे. याबाबतची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली आहे.