पोर्तुगाल आणि भारत या दोन्ही देशांमध्ये ११ महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. तसेच वाढत्या दहशतवादाविरोधात पोर्तुगाल आणि भारत हे एकत्र आले आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताची दावेदारी, बहुपक्षीय निर्यात प्रतिबंधाबाबत पोर्तुगालने दिलेला पाठिंबा या सगळ्या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोर्तुगालचे आभार मानले आहेत. भारत आणि पोर्तुगाल हे दोन्ही देश एकत्र येऊन जगात मोठे योगदान देऊ शकतात. पोर्तुगालचे पंतप्रधान एंटोनियो कोस्टा यांना ओव्हरसिज सिटीझन ऑफ इंडियाचे कार्डही भेट दिले.

भारत आणि पोर्तुगाल यांच्या दरम्यान, विज्ञान, तंत्रज्ञानासाठी ४० लाख युरोंचा कोष स्थापण्यावर एकमत झाले आहे. खेळ आणि तरुणांचे प्रश्न, विज्ञान या संदर्भात नवे करारही करण्यात आले आहेत, असेही मोदींनी स्पष्ट केले. इतकेच नाही तर लिस्बनमध्ये त्यांनी भारत आणि पोर्तुगाल यांच्यातल्या आंतरराष्ट्रीय स्टार्ट-अप हबचे उद्घाटनही केले. स्टार्ट अप संदर्भातल्या पायाभूत विकासाला लिस्बनमधल्या स्टार्टअप हबमुळे नवी चालना मिळेल असेही मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. तसेच लिस्बनमध्ये असलेल्या राधा-कृष्ण मंदिरालाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली.