मलेशियन एअरलाइन्सचे भारतात येत असलेले विमान तांत्रिक बिघाडामुळे माघारी वळविण्यात आले. क्वालांलपूर येथे रविवारी ते विमान सुरक्षितपणे उतरविण्यात आले.  एमएच-१९८ हे क्वालालंपूर ते हैदराबाद या विमानाने शनिवारी रात्री १०.२० उड्डाण केले. पण ऑटोपायलेट प्रणालीतील खराबीमुळे त्या विमानाला माघारी फिरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे हे विमान पहाटे २.०१ मिनिटानी पुन्हा क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुन्हा दाखल झाले. दरम्यान विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने पायलटने विमान माघारी वळवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एअरलाईन्सने दिली. या विमानाला आग लागल्याचे सोशल मीडियावर चर्चा आहे. मात्र, या वृत्ताचे मलेशियन प्रशासनाने खंडण केले आहे.
या वर्षात मलेशिया एअरलाईन्सच्या दोन विमानांना मोठा अपघात झाला. मलेशियाचे एमएच३७० हे विमान अचानक बेपत्ता झाले. या विमानाचा अद्याप शोध लागलेला नाही. यामध्ये २३९ प्रवासी प्रवास करत होते. त्यानंतर १७ जुलै रोजी मलेशियाच्या विमानाला युक्रेनमध्ये पाडण्यात आले होते यामध्ये २८९ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या दोन्ही अपघातांच्या पार्श्वभूमीवर विमान प्रवासाबाबत मलेशियाकडून विशेष काळजी घेतली जात आहे.