१९६२ मध्ये झालेल्या भारत-चीन युद्धात भारताला पराभवाचा कलंक केवळ तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यामुळे लागला. त्यांनी युद्धामध्ये हवाईदल वापरण्यास परवानगी न दिल्यामुळे हा पराभव झाला, अशी टीका माजी हवाईदल प्रमुख ए. वाय. टिपणीस यांनी केली आहे. नेहरूंनी जागतिक राजकारणातील उद्दिष्टे साधण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नांना बगल दिली होती, असा आरोपही त्यांनी केला.
‘इंडिया अ‍ॅण्ड चायना : आफ्टर फाइव्ह डीकेड्स ऑफ १९६२ वॉर’ या विषयावर दिल्लीमध्ये नुकत्याच झालेल्या चर्चासत्रामध्ये टिपणीस यांनी नेहरूंवर टीकेच्या तोफा डागल्या. हवाईदलातून निवृत्त झालेले ७२ वर्षीय टिपणीस १९६० मध्ये हवाईदलात ‘फायटर पायलट’ म्हणून सेवेत रुजू झाले होते. ३१ डिसेंबर १९९८ ते २००१ या कालावधीत त्यांनी हवाईदल प्रमुख म्हणून काम पाहिले आहे.
चीनसोबतच्या युद्धात हवाईदलाचा वापर केला असता, तर युद्धाचा निकाल वेगळा झाला असता, असे विद्यमान हवाईदल प्रमुख एन. ए. के. ब्राऊन यांनी गेल्या सोमवारी स्पष्ट केले होते. त्याचाच जोरदार पुनरुच्चार करून टिपणीस यांनी नेहरूंना लक्ष्य केले. नेहरू हे आपले राजकीय हेतू साधण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दावणीला लावत असत, या बाबतचे सत्य कमीअधिक प्रमाणात जगजाहीर आहे. जागतिक राजकारणामध्ये सक्रिय राहण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. त्यामुळे चीन युद्धाच्या पराभवाचे ‘खरे शिल्पकार’ म्हणून त्यांचे नाव घेता येईल, असे टिपणीस म्हणाले.
चीन युद्धात हवाईदल वापरले न गेल्याचा मुद्दा गेल्या पाच दशकांहून अधिक काळ लष्करी भाष्यकारांमध्ये वादाचा ठरला आहे. टिपणीस यांच्या वक्तव्याने त्यात आणखी तेल ओतले गेले आहे.