भारत आणि पाकिस्तान यांच्यातील काश्मीरचा प्रश्न सोडविण्यासाठी दोन्ही देशांच्या सदिच्छा गरजेच्या आहेत, असे मत संयुक्त राष्ट्रसंघाच्या दहशतवादविरोधी समितीच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी भारत आणि पाकिस्तानच्या सदिच्छा गरजेच्या आहेत, त्याशिवाय हा प्रश्न कसा सोडविता येईल, असे समितीचे कार्यकारी संचालक जीन-पॉल लॅबोर्ड यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांमधील काश्मीर प्रश्न आणि दोन्ही देशांमधील तिढय़ामुळे निर्माण झालेली दहशतवादाची समस्या याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता लॅबोर्ड यांनी वरील मत व्यक्त केले. जनतेला एकत्रित आणून चर्चा करणे ही संयुक्त राष्ट्रसंघाची भूमिका आहे. एक दिवस आम्ही हा प्रश्न सोडवू आणि त्यामुळे या प्रदेशातील दहशतवादही कमी होईल, असेही लॅबोर्ड यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. दहशतवादाचा धोका जागतिक पातळीवर आहे आणि त्याचा मुकाबला करण्यासाठी व्यापक आणि एकत्रित प्रयत्नांची गरज आहे, कोणताही एक देश त्याविरुद्ध एकटय़ाने लढा देऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.