अनेक दिवसांपासून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे. परंतु, चीनच्या विरोधामुळे भारताला आपले ईप्सित साध्य करता आलेले नाही. भारताच्या स्थायी सदस्यत्वाचे समर्थन करणाऱ्या अमेरिकेने आता एक अट ठेवली आहे. भारताला स्थायी सदस्यत्व हवे असेल तर त्यांनी नकाराधिकार (व्हेटो) सोडावा अशी अट त्यांनी ठेवली आहे. भारताला स्थायी सदस्यत्व मिळाले तरी त्यांना एखाद्या प्रस्तावावर व्हेटोचा अधिकार नसेल.

रशिया आणि चीन हे दोन देश सुरक्षा परिषदेच्या सध्याच्या प्रारूपात बदल करण्याच्या विरोधात असल्याचे अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्र संघातील राजदूत निकी हेली म्हणाल्या. अमेरिका-भारत मैत्री परिषद आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्हेटोपेक्षाही अनेक महत्वाच्या गोष्टी आहेत. सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सदस्यांकडे व्हेटोचा अधिकार आहे. यामध्ये रशिया, चीन, अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सचा समावेश होतो. यातील एकाही देशाला हा अधिकार सोडायचा नाही व दुसऱ्या देशाला हा अधिकार देण्यात येऊ नये, असाही त्यांचा सूर आहे. त्यामुळे सुरक्षा परिषदेत भारताला सहभागी होता आलेले नाही. भारताने व्हेटो अधिकाराचा हट्ट सोडला पहिजे, असे हेली म्हणाल्या.

भारताला अमेरिकेचे आधीपासूनच समर्थन आहेच. सुरक्षा परिषदेतील दोन स्थायी सदस्य रशिया आणि चीनकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यांना सुरक्षा परिषदेत कोणत्याही प्रकारचा बदल नकोय. हा संयुक्त राष्ट्राचा मुद्दा आहे. यासाठी संयुक्त राष्ट्रांत सुधारणेची गरज असेल आणि मला वाटतं की, भारताने जास्तीतजास्त समर्थन मिळवावे, असेही त्यांनी म्हटले.