भारताविषयी चीनमध्ये प्रचंड आकर्षण आहे. मात्र जगातून भारतात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येच्या तुलनेत चिनी पर्यटकांची संख्या अत्यल्प आहे. आश्चर्य म्हणजे भारतातून चीनमध्ये जाणाऱ्या पर्यटकांची संख्याही क्षमता लक्षात घेता कमीच असल्याचे दिसते. हे लक्षात घेत भारतातर्फे चीनमध्ये सन २०१५ हे वर्ष ‘व्हिजिट चायना इयर’ म्हणून साजरे करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विविध भारतीय पर्यटनस्थळांची माहिती देणारे अनेक कार्यक्रम चीनमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती तेथील भारतीय राजदूत अशोक के. कांथा यांनी दिली.
संयुक्त राष्ट्रांमधील जागतिक पर्यटन संघटनेच्या अहवालानुसार, चीनमधून आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या सन २००० मध्ये १ कोटी होती. अवघ्या १२ वर्षांत वाढून ती ८ कोटी ३० लाख झाली. विशेष म्हणजे २०११ ते २०१२ या एका वर्षांत चिनी पर्यटकांकडून करण्यात येणाऱ्या खरेदीतही तब्बल ४० टक्क्य़ांची वाढ दिसून आली. मात्र या पाश्र्वभूमीवर चीनमधून भारतात आणि भारतातून चीनमध्ये जाणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय नव्हती. म्हणूनच चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या भारतदौऱ्यात पर्यटनास चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला.
लवकरच पंतप्रधानांचाही दौरा?
२०१४ हे वर्ष भारत-चीन द्विपक्षीय संबंधांना चालना देणारे होते. या वर्षांत भारतीय उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी चीनला, तर चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी भारताला भेट दिली. चालू वर्षी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला भेट देतील, अशी माहिती कांथा यांनी दिली

पर्यटनासाठी सारे काही..
द्विपक्षीय समझोत्यानुसार यंदाचे वर्ष ‘व्हिजिट इंडिया इयर’ म्हणून, तर पुढील वर्ष ‘व्हिजिट चायना इयर’ म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने भारतातील पर्यटन व्हिसा मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुटसुटीत करण्यात आली आहे. सध्या चीनला प्रतिवर्षी पाच लाख भारतीय उद्योजक भेट देतात, तर चीनमधून येणाऱ्या उद्योजकांची संख्या एक लाखाच्या घरात असते. मात्र हे चित्र बदलण्यासाठी उभयपक्षी विशेष प्रयत्न होणार आहेत. बीजिंगसह अन्य चिनी शहरांमध्ये महत्त्वाच्या भारतीय पर्यटनस्थळांविषयी माहिती दिली जाणार आहे.