लष्करी कारवायांमध्ये धाडसाने शत्रूंना सामोरे जाणाऱ्या सैन्याच्या जवानांना केंद्र सरकारने सुरक्षा कवच दिले आहे. सैन्याच्या जवानांसाठी केंद्र सरकारने नवीन बुलेटप्रुफ हेल्मेट Bullet Proof Helmets घेतले असून गेल्या दशकभरापासून जवानांसाठी बुलेटप्रूफ हेल्मेटची मागणी केली जात होती.

भारतीय सैन्यातील जवान सध्या जुन्या काळातील हेल्मेट वापरत होते. पण हे हेल्मेट शत्रूंच्या गोळीपासून संरक्षण करण्यासाठी सक्षम नव्हते. या हेल्मेटचे वजन सुमारे अडीच किलो होते. याशिवाय यात जवानाचे डोक पूर्णपणे सुरक्षित राहील याची खात्रीही नव्हती. यात डोक्याच्या मागच्या बाजूचे संरक्षण होत नव्हते.

सैन्याच्या जवानांना लष्करी कारवायांदरम्यान आधुनिक हेल्मेट द्यावे अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात होती. शेवटी केंद्र सरकारने वर्षाच्या सुरुवातीला कानपूरमधील एमकेयू लिमिटेड या कंपनीला बुलेटप्रूफ हेल्मेटचे कंत्राट दिले होते. यूके आणि नाटोच्या सैन्यालाही याच कंपनीने हेल्मेट पुरवले होते. संरक्षण मंत्रालयासोबत झालेल्या १८० कोटी रुपयांच्या या करारानुसार कंपनी सैन्याला १ लाख ६० हजार बुलेटप्रूफ हेल्मेट देणार आहे. यातील पहिल्या टप्प्यातील हेल्मेट सैन्याकडे सुपूर्त करण्यात आले. जागतिक पातळीवरील निकषाचे या हेल्मेटमध्ये पालन करण्यात आले आहे. या हेल्मेटमध्ये कम्यूनिकेश डिव्हाईस आणि नाईट व्हिजन डिव्हाईसही लावणे शक्य होणार आहे. भारतासह जर्मनीत चाचणी केल्यानंतरच हे हेल्मेट ग्राहकांना दिले जातात असे कंपनीचे म्हणणे आहे. सैन्याला दिलेले हेल्मेट ९ मिलीमीटर गोळीचा मारा सहन करु शकतील असे कंपनीने म्हटले आहे.