ऊर्जेच्या वाढत्या किमतीमुळे वाढत जाणारा खर्च भरून काढण्यासाठी पुढील वर्षीच्या सुरुवातीला सादर होणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पात प्रवासी भाडेवाढ केली जाण्याची शक्यता आहे.
डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या इंधनावर आधारित भाडे पुनर्निर्धारणाची (टॅरिफ रिव्हिजन) अंमलबजावणी फेब्रुवारीत सादर होणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पात केली जाईल. अलीकडच्या महिन्यांमध्ये ऊर्जेचा खर्च ४ टक्क्य़ांहून अधिक वाढलेला असल्यामुळे भाडेवाढ करणे गरजेचे आहे, असे रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
रेल्वेने जाहीर केलेल्या धोरणानुसार, इंधन आणि ऊर्जा यांच्या खर्चाशी जोडले गेलेले प्रवासी आणि मालवाहतूक भाडे पुनर्निर्धारण वर्षांतून दोन वेळा करण्यात येते. यापूर्वी जून महिन्यात झालेल्या पुनर्निर्धारणात प्रवासी भाडे ४.२ टक्क्य़ांनी, तर मालवाहतूक भाडे १.४ टक्क्य़ांनी वाढवण्यात आले होते.
 ‘रेल्वेवरील बोजाचा काही भाग लोकांनी वाटून घ्यायला हवा’, असे अलीकडेच एका कार्यक्रमात सांगून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी संभाव्य भाडेवाढीचे संकेत दिले होते.