GST अर्थात वस्तू आणि सेवा कर लागू झाल्याने सुरूवातीला अडचणी निर्माण होऊ शकतात, असे वक्तव्य केंद्रीय शहरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. वस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटीबद्दल पहिल्यांदाच सरकारतर्फे येणाऱ्या अडचणींबाबत वक्तव्य करण्यात आले आहे.आपल्या ट्विटर अकाऊंटवर व्यंकय्या नायडू यांनी यासंदर्भातला ट्विट केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी किंवा इतर कोणत्याही मंत्र्याने आजवर कधीही जीएसटीमुळे काही अडचणी निर्माण होतील असे म्हटलेले नाही. उलट अमेरिका दौऱ्यावर असलेले नरेंद्र मोदी हे तिथल्या गुंतवणूकदारांना जीएसटी कसा फायदेशीर आहे हेच सांगत आहेत.

केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सोमवरी या करप्रणालीनंतर अडचणी वाढू शकतात असे ट्विट केले आहे.तसेच प्राथमिक स्तरावर येणाऱ्या अडचणींवर आम्ही तातडीने उपाय योजना करू, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. तसेच वस्तू आणि सेवा कर परिषदेतही या अडचणींवर तोडगा काढून करप्रणाली जास्तीत जास्त सुरळीत करण्यावर आणि सगळ्या अडचणी संपवण्यावर भर दिला जाईल असेही नायडू यांनी स्पष्ट केले आहे. ३० जूनच्या मध्यरात्री होणाऱ्या दिमाखदार कार्यक्रमात जीएसटी लागू करण्यात येणार आहे. वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी झाल्यावर नेमके काय होणार? याबाबत अजूनही जनतेच्या मनात काही प्रश्न आहेत.

रविवारीच केंद्रीय मंत्री निर्मला सीतरामण यांनी जीएसटीमुळे महागाई वाढेल हा दावा मूर्खपणाचा असल्याचे म्हटले होते. मात्र आज मोदींच्याच मंत्रिमंडळातल्या महत्त्वाच्या नेत्याने जीएसटीमुळे प्राथमिक स्तरावरच्या अडचणी वाढू शकतात असे म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या स्वदेशी जागरण मंचानेही जीएसटीमुळे चीनला जास्त फायदा होईल भारताला नाही असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनीही या करप्रणालीच्या अडचणींचा उल्लेख केला आहे.

व्यापारी असोत किंवा सामान्य जनता सगळ्यांनाच नव्या कराबाबत उत्सुकता आहे. तसेच ही करप्रणाली लागू झाल्यावर नेमके काय बदल होतील? महागाई तर वाढणार नाही ना याची चिंताही सतावते आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर नायडू यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा होते आहे. जीएसटी लागू झाल्यावरच नायडू उल्लेख करत असलेल्या अडचणी काय आहेत? तसेच त्यावर काय मार्ग काढता येऊ शकतो हे स्पष्ट होणार आहे.