अवकाशात मानव पाठवण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत भारताने गुरुवारी यशस्वीरीत्या मानवविरहित अवकाश कुपी वातावरणात जास्त उंचीवर पाठवली. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) जीएसएलव्ही मार्क ३ या सर्वात जड उपग्रह प्रक्षेपकाच्या साह्याने हा प्रयोग यशस्वी करत देशाच्या अवकाश संशोधनात मैलाचा दगड गाठला.
श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्राच्या दुसऱ्या क्रमांकाच्या प्रक्षेपण तळावरून गुरुवारी सकाळी dv06साडेनऊ वाजता ‘जीएसएलव्ही मार्क ३’ने उड्डाण केले. त्यानंतर सुमारे ७३० सेकंदांनी (१२ मिनिटे दहा सेकंद) या प्रक्षेपकातील क्य्रू मॉडय़ूल अ‍ॅटमोस्फेरिक री-एन्ट्री एक्स्पीरिमेंट (सीएआरई-केअर) ही अवकाश कुपी सुरक्षितपणे बंगालच्या उपसागरात कोसळली. या संपूर्ण प्रक्षेपणातील तिन्ही टप्पे यशस्वीरीत्या पार पडले. अवकाश कुपी सुरक्षितपणे उतरवण्यासाठी ‘डीआरडीओ’च्या आग्रा येथील प्रयोगशाळेने पॅराशूट बनवले होते. मुख्य पॅराशूटचा व्यास ३१ मीटर इतका असून देशात प्रथमच एवढा मोठा पॅराशूट बनवण्यात आला होता.
वातावरणातील जास्त उंची गाठून परतलेली ‘केअर’ अंदमान व निकोबार बेटांच्या दक्षिणेकडील टोक असलेल्या इंदिरा पॉइंटपासून १८० किमी अंतरावरील समुद्रात पडली. ‘अवकाश कुपीकडून आम्हाला सिग्नल मिळाला असून भारतीय तटरक्षक दलाचे जहाज ती कुपी आणत आहे,’ अशी माहिती ‘इस्रो’च्या मानवी अवकाशउड्डाण कार्यक्रमाचे प्रकल्प संचालक एस. उन्नीकृष्णन नायर यांनी दिली. ही अवकाश कुपी आता चेन्नईजवळील एन्नोर येथील कमराजर बंदरात आणली जाईल व तेथून ती केरळातील थिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात आणून त्यावर अभ्यास केला जाणार आहे.
गुरुवारच्या प्रक्षेपणाने अवकाशात मानव पाठवण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेला बळ दिले आहे. मानवी अवकाशयान पाठवण्यात अजून दहा वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र अवकाशात मानवाला यशस्वीपणे परत आणण्याच्या प्रयोगातील हा मैलाचा दगड आहे. अवकाशकुपीच्या माध्यमातून अवकाशवीरांना २०२५ पर्यंत अवकाशात पाठवता येईल. ही अवकाशकुपी वातावरणातील १६०० अंश सेल्सियस तापमानाला टिकाव धरू शकते हे स्पष्ट झाले आहे.
*आजचा दिवस भारतीय अवकाश कार्यक्रमाच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या प्रक्षेपणामुळे आपण चार टन वजनापर्यंतचे उपग्रह अवकाशात सोडू शकू. दहा वर्षांपूर्वी एलव्हीएम मार्क ३ (जीएसएलव्ही मार्क ३) हा प्रक्षेपक तयार करण्याची तयारी सुरू केली होती, त्याचे हे प्रायोगिक उड्डाण यशस्वी झाले आहे.
के. राधाकृष्णन, इस्रोचे अध्यक्ष

‘जीएसएलव्ही’चा आर्थिक फायदा
‘जीएसएलव्ही मार्क ३’च्या संशोधनातील प्रगतीमुळे भारताचा दुहेरी आर्थिक फायदा होणार आहे. एकीकडे अवजड उपग्रह वाहून नेण्यासाठी परदेशी अवकाश संस्थांची मदत घेण्याकरिता मोजावे लागणारी भरमसाट रक्कम वाचणार आहे. तर दुसरीकडे, भविष्यात ‘इस्रो’च अन्य देशांचे अवजड उपग्रह नेण्याच्या कामासाठी मोठय़ा प्रमाणात परकीय चलन कमवू शकते.

‘जीएसएलव्ही’ कशासाठी?
*‘इस्रो’तर्फे अवकाशात पाठवण्यात येणाऱ्या ‘पीएसएलव्ही’ उपग्रह प्रक्षेपकाला चांगले यश मिळाले आहे. मात्र, पृथ्वीभोवतालच्या १६० किमी ते २००० किमीपर्यंतच्या कक्षेत (लो अर्थ ऑर्बिट) अवजड उपकरणे वाहून नेण्यात ‘पीएसएलव्ही’ अयशस्वी ठरण्याचा अंदाज आहे.
*त्यामुळे ‘इस्रो’तर्फे ‘जिओसिंक्रोनस लाँच व्हेइकल’ (जीएसएलव्ही) प्रक्षेपकाच्या निर्मितीचे काम सुरू आहे.
*तामिळनाडूतील महेंद्रगिरी येथील इस्रोच्या प्रयोगशाळेत जास्त वजन वाहून नेणाऱ्या क्रायोजेनिक इंजिनाच्या निर्मितीचे काम सुरू आहे.
*‘जीएसएलव्ही’ प्रक्षेपकासाठी १४० कोटी रुपये खर्च होतात, तर अवकाशकुपीसाठी १५ कोटी रुपये खर्च आहे.

अवकाशकुपीचा प्रवास
*सकाळी साडेनऊ वाजता ‘जीएसएलव्ही’ च्या साह्याने उड्डाण
*१२६ किमी उंची गाठल्यानंतर ३७७५ किलो वजनाची ‘केअर’ अवकाश कुपी प्रक्षेपकापासून वेगळी.
*समुद्रसपाटीपासून ८० किमी अंतरावरून कुपी पॅराशूटच्या मदतीने बंगालच्या उपसागरात.
*एलव्हीएम ३ एक्स उड्डाणात एस २०० व एल ११० या दोन टप्प्यांचा वापर करण्यात आला होता. सी २५ हे डमी इंजिन होते. त्याच्या मदतीने अवकाशकुपी पेलोडच्या रूपात पाठवण्यात आली होती.

अवकाशकुपीबद्दल
३७७५ किलो वजनाची ‘केअर’ ही अवकाशकुपी कपकेकच्या आकाराची आहे. तिची उंची २.७ मीटर, तर व्यास ३.१ मीटर आहे.
त्याचा आतील भाग अ‍ॅल्युमिनियम संमिश्राचा आहे. त्याला उष्णतारोधक आवरणही लावलेले होते.