जलिकट्टूच्या समर्थनार्थ तामिळनाडू सरकारने पाठवलेल्या अध्यादेशाला केंद्रीय कायदा, पर्यावरण आणि सांस्कृतिक मंत्रालयाने परवानगी दिली आहे. अॅटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांच्याशी चर्चा केल्यानंतर कायदा मंत्रालयाने हा अध्यादेश अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे पाठवला आहे. शनिवारपर्यंत हा अध्यादेश लागू होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी जलिकट्टूसंदर्भात एक आठवड्यापर्यंत कोणताही निर्णय देऊ नये अशी विनंती केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला केली होती. धार्मिक भावनांमुळे राज्यात निदर्शने होत असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी भूमिका सरकारने मांडली होती. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारची ही विनंती मान्य केली होती. जलीकट्टूवरील (बैलांच्या शर्यती) बंदी उठविण्याच्या मागणीसाठी तामिळनाडूमध्ये सलग पाच दिवसांपासून तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे धास्तावलेले मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली होती. जल्लीकट्ट हे तमिळ संस्कृतीचे प्रतीक असून, त्यावरील बंदी उठविण्याच्या मागणीसाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. हजारो लोकांनी मरीना समुद्र किनाऱ्यावर एकत्र येऊन जलीकट्टुच्या समर्थनार्थ निदर्शने केली. तमुक्कममध्ये या मागणीसाठी तीन विद्यार्थ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. तर काही ठिकाणी बैलांना मोकाट सोडून प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. ख्यातनाम संगीतकार ए आर रेहमान, अभिनेता कमल हसन, बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद अशा दिग्गज मंडळींनीही जलीकट्टूचे समर्थन दिले आहे. या आंदोलनात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंते आणि कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला आहे. जलीकट्टुविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या ‘पेटा’ या संस्थेविरोधातही आंदोलकांनी रोष व्यक्त केला. २०१४ साली प्रथम जलीकट्टू या सणावर न्यायालयाने बंदी घातली होती. पोंगल सणादरम्यान खेळण्यात येणारा जलीकट्टू हा तामिळनाडूचा पारंपारिक खेळ आहे. या खेळावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. जलीकट्टू या खेळाचा अर्थ आहे वळूंना वश करणे. या खेळाला २००० वर्षांची परंपरा आहे. जलीकट्टू हा खेळ देशातील सर्वात धोकादायक खेळांपैकी एक मानला जातो. या खेळामुळे आतापर्यंत कित्येक लोक मृत्यूमुखी पडले आहे तर अनेकांना अपंगत्वदेखील आले आहे. २०१० ते २०१४ दरम्यान या खेळामुळे १,१०० लोक गंभीरिरत्या जखमी झाले तर १७ जणांना आपला जीव गमवावा लागला. गेल्या २० वर्षांमध्ये २०० पेक्षा अधिक लोक बळी पडले आहेत. या खेळात ज्या बैलांचा वापर होतो त्यांच्यावर अत्याचार केले जातात असे प्राणीमित्रांचे म्हणणे आहे.