देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी दिलेला शांततामय सहअस्तित्वाचा संदेश सदासर्वकाळ लागू आहे; त्याला काळाच्या मर्यादा नाहीत, असे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी सांगितले. दरम्यान, त्यांनी इस्रायलचा दौरा आटोपताना पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू व अध्यक्ष रूवेन रिव्हलिन यांना भारतभेटीचे निमंत्रण दिले.या दोघा नेत्यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे.

पहिले पंतप्रधान नेहरू यांच्याबाबत अलीकडेच जी वक्तव्ये करण्यात आली त्याबाबत विचारले असता तेल अवीव ते नवी दिल्ली या विमानप्रवासात त्यांनी वार्ताहरांना सांगितले की, नेहरूंची काही तत्त्वे आजही तेवढीच योग्य आहेत; त्यात शांततामय सहजीवनाचेही तत्त्व आहे, त्याला कालमर्यादा नाही. आजच्या काळात नेहरूंची तत्त्वे सुसंगत आहेत काय, या प्रश्नावर ते उत्तर देत होते. धर्म हे देशाचे अधिष्ठान असता कामा नये, असे विधान मुखर्जी यांनी इस्रायलमध्ये केले होते; त्यावर विचारले असता ते म्हणाले की, धर्म देशाचे अधिष्ठान असता कामा नये. याचा अर्थ, समजा अरब देशांमध्ये इस्लाम धर्म आहे तर ते अरब देश धर्माच्या आधारावर एकत्र आलेले नाहीत. पाकिस्तान भारतातून १९४७ मध्ये वेगळा झाला, त्यानंतर पाकिस्तानातून २५ वर्षांतच बांगलादेश वेगळा निघाला. पॅलेस्टिनी दहशतवादाचा निषेध केला नाही म्हणून मुखर्जी यांच्यावर इस्रायलने टीका केली होती. त्यामुळे इस्रायल-पॅलेस्टाईन वादावर स्पष्ट भूमिका का मांडली नाहीत, या प्रश्नावर ते म्हणाले की, विविध देशांचे वेगवेगळे संबंध असतात.
दुसऱ्या देशाने त्यात प्रतिक्रिया द्यायची नसते त्यालाच आंतरराष्ट्रीय राजनीती म्हणतात. भारताचे २३ वर्षांपासून इस्रायलशी राजनैतिक संबंध आहेत व ती तात्त्विक भूमिका आहे, ती कायम आहे. आपण दोन्ही बाजूच्या नेत्यांशी बोललो, त्यात इस्रायली व पॅलेस्टिनी नेत्यांची या संघर्षांवर तोडगा काढण्याची इच्छा दिसून आली असे निरीक्षण त्यांनी मांडले.