झारखंडची राजधानी असलेल्या रांचीच्या राजेंद्र इन्सिटट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या रूग्णालयात एका तान्ह्या बाळाचा मृत्यू झाला आहे. या बाळाच्या सिटी स्कॅनसाठी फक्त ५० रूपये कमी पडत होते, म्हणून ही चाचणी झाली नाही, अखेर या बाळाचा मृत्यू झाला आहे. या बाळाच्या मृत्यूला रूग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप या बाळाचे वडिल संतोष कुमार यांनी केला आहे.

आरआयएमएस रूग्णालयात सिटी स्कॅनची फी १३५० रूपये आहे, संतोष कुमार यांच्याकडे १३०० रूपये होते जे त्यांनी सिटी स्कॅनसाठी भरले, मात्र १३५० रूपये भरल्याशिवाय आम्ही सिटी स्कॅन करणार नाही अशी आडमुठी भूमिका सिटी स्कॅन लॅबच्या कर्मचाऱ्यांनी घेतली. सिटी स्कॅन न होऊ शकल्याने हे बाळ दगावले आहे.

संतोष कुमार यांच्या तान्ह्या बाळाच्या डोक्याला जखम झाली, त्यामुळे या बाळाला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी या मुलाची तपासणी केली आणि सिटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर संतोष कुमार आपल्या बाळाला घेऊन सिटी स्कॅन लॅबमध्ये गेला. सिटी स्कॅनची फी १३५० रूपये असल्याचे त्याला सांगण्यात आले. संतोष कुमार यांच्याकडे १३०० रूपयेच होते. त्यांनी ही बाब लॅबच्या कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे सांगितली. मात्र १३५० रूपये घेऊन या त्याशिवाय सिटी स्कॅन होणार नाही अशी आडमुठी भूमिका या लॅब कर्मचाऱ्यांनी घेतली आणि संतोष कुमार यांना टेस्ट न करताच तिथून पाठवून दिलं. ज्यानंतर संतोष कुमार यांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे.

रांचीच्या आरआयएमएस रूग्णालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टरला लोक देवाचा दुसरा अवतार मानतात कारण जीवदान देणं हे त्याचं काम असतं. अनेक दुर्धर आजारांतून डॉक्टर रूग्णांना बरं करतात. अनेक रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करतात, अशात अशी धक्कादायक घटना रांचीमध्ये घडली आहे. सिटी स्कॅन लॅबच्या कर्मचाऱ्यांना बाळाची आणि त्याच्या आई वडिलांच्या परिस्थितीची थोडीशीही दया आली नाही का? त्यांच्यात तेवढीही माणुसकी उरली नाही का असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.