भारताशी चर्चा सुरू करण्यासाठी पाकिस्तान आढेवेढे घेत असताना तसेच म्यानमार हद्दीत भारताने बंडखोरांवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतावर बिनबुडाचे आरोप करून जो उतावीळपणा दाखवला त्याबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी दूरध्वनीवरून कानपिचक्या दिल्या. भारत व पाकिस्तान या दोन्ही देशात अजिबात गैरसमज खपवून घेतले जाणार नाहीत, असे त्यांनी दोन्ही देशात वाढलेल्या तणावाच्या संदर्भात सांगितले.
केरी यांनी वार्ताहरांना सांगितले, की आपण पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना दूरध्वनी करून भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्याबाबत कानउघाडणी केली, आम्हाला या तणावाची स्वाभाविकच चिंता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना दूरध्वनी करून रमझानच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
भारत व पाकिस्तान हे दोन महत्त्वाचे देश असून प्रादेशिक हितसंबंधात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे त्यांच्यात अजिबात गैरसमज असता कामा नये. काहींना आपण सक्षम झाल्याचे वाटत आहे त्याचे कारण तेच आहे. पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी अलिकडेच असे म्हटले होते, की पाकिस्तानी लष्कराने बांगडय़ा भरलेल्या नाहीत व आमची अण्वस्त्रे लग्नाच्या वरातीत उडवण्यासाठी नाहीत.
केरी यांच्या मते शरीफ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून आपण भारतीय पंतप्रधानांशी बोललो आहोत असे सांगितले, येत्या काही दिवसांत व आठवडय़ांत तणाव कमी झाला पाहिजे, अशी अमेरिकेची अपेक्षा असल्याचे केरी यांनी सांगितले.
पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी गेल्या आठवडय़ात भारतावर आगपाखड करताना भारतीय नेत्यांची विधाने बेजबाबदारपणाची असून आम्ही आमच्या देशाचे कुठलेही मोल देऊन संरक्षण करू असे म्हटले होते. माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी म्यानमारमध्ये घुसून भारताने केलेल्या कारवाई
नंतर हा इतर देशांना संदेश आहे असे म्हटले होते. अप्रत्यक्षपणे त्यांनी पाकिस्तानला तो इशारा होता.