काबूलमधील तैमानी भागात अपहरण झालेल्या ज्युडिथ डिसूझा या तरुणीची सुखरुप सुटका झाल्यानंतर ती शनिवारी भारतात परतली आहे. यापुर्वी काबूलमधून तिची सुटका करण्यात आल्याची माहिती भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली होती. ज्युडिथ लवकरच मायदेशात परतेल, असेही त्यांनी म्हटले होते. ज्युडिथचे ९ जून २०१६ रोजी अपहरण करण्यात आले होते.
ज्युडिथ ही मुळची कोलकाता येथील असून ती अफगाणिस्तानातील आगाखान फाउंडेशनमध्ये काम करते. अपहरण झालेल्या ज्युडिथ डिसूजा यांची सुखरुपरित्या सुटका झाल्याचे सांगताना मला खूप आनंद होत आहे, अशा आशयाचे ट्विट परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केले आहे. तसेच ज्युडिथच्या सुटकेसाठी मदत करणा-या अफगाणिस्तानचेही स्वराज यांनी आभार मानले असून  त्यांनी राजदूत मनप्रीत व्होरा यांचेही कौतुक केले. ज्युडिथच्या पालकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तिच्या सुटकेसाठी स्वतः लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानंतर सुषमा स्वराज यांनी ज्युडिथचे वडील व बहीण यांच्याशी संपर्क साधला होता.
भारतीय दूतावासाने अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत ज्युडिथच्या सुरक्षित सुटकेसाठी प्रयत्न केले होते. अखेर आज त्या प्रयत्नांना यश मिळाले व ज्युडिथची सुखरूप सुटका झाली.