सीमा सुरक्षा दलाच्या छावणीवर हल्ला करण्यासाठी गेलेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काश्मीरमध्ये सहा नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेमध्ये अन्य काही जण जखमी झाले असून, त्यांच्यामध्ये जवानांचा समावेश आहे. जम्मू काश्मीरमधील रामबान जिल्ह्यामध्ये गुरुवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिले आहेत. 
सीमा सुरक्षा दलाच्या गस्तीवर असलेल्या काही जवानांनी गूल तालुक्यात एका संशयास्पद तरुणाला ताब्यात घेऊन त्याला माराहाण केली होती. जवानांच्या या कारवाईविरोधात स्थानिक मदरशातील एका मौलवीने प्रक्षोभक वक्तव्य केल्यानंतर गावातील जमाव संतप्त झाला आणि तो सीमा सुरक्षा दलाच्या छावणीवर चालून गेला. हल्लेखोरांनी छावणीवर दगडफेक करण्यास सुरुवात केल्यानंतर झालेल्या गोळीबारात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला.