गेल्या ४९ दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराचा जम्मू काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. संचारबंदी व हिंसाचारामुळे जम्मू काश्मीरचे तब्बल ६४०० कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुऱ्हाणवानी आठ जुलै रोजी सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत ठार झाला होता. तेव्हापासून काश्मीर खोऱ्यात सुरू झालेला हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही. या हिंसाचाराचा काश्मीरच्या पर्यटनावर मोठा परिणाम झाला आहे. सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत आतापर्यंत ६६ जणांचा मृत्यू झाला असून हजारो लोक जखमी झाले आहेत. अनेक दिवसांपासून दुकाने, व्यवसाय, खासगी कार्यालये, पेट्रोल पंप बंद आहेत. वाणीच्या मृत्यूनंतर फुटीरवाद्यांनी विरोध तीव्र केला आहे. दररोज सुमारे १३५ कोटी रूपयांचे नुकसान होत असून आतापर्यंत ६४०० कोटी रूपयांपेक्षाही अधिक नुकसान झाल्याचे काश्मीरी व्यापारी संघाचे अध्यक्ष मोहम्मद यासीन खान यांनी सांगितले.