दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळण्याची शक्यता आहे. राज्यपाल नजीब जंग हे केंद्रातील मोदी सरकारसाठी दिल्ली सरकारचे मंत्री आणि अधिकाऱयांवर पाळत ठेवून हेरगिरी करत असल्याचा खळबळजनक आरोप केजरीवाल यांनी केला आहे. दिल्ली सरकारमधील मंत्र्यांच्या कार्यालयात किती जण भेटायला येतात, सरकारने किती अधिकाऱयांची नियुक्ती केली, सल्लागार म्हणून किती जणांना ठेवण्यात आले आहे, अशी सर्व माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने मे महिन्यात दिल्ली सरकारकडून मागवून घेतली होती. नजीब जंग यांच्या तक्रारीमुळेच ही माहिती केंद्राने मागवून घेतल्याचा संशय केजरीवाल सरकारला आहे. त्यामुळे केजरीवाल यांनी ट्विटकरून राज्यपालांवर थेट लक्ष्य केले. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना आणि मंत्र्यांना कोण भेटते यावर राज्यपाल पाळत ठेवत असून ही माहिती ते पंतप्रधान कार्यालयाला पाठवित असल्याचे केजरीवाल यांनी ट्विट केले आहे. केजरीवालांच्या या आरोपामुळे हे प्रकरण चिघळण्याची दाट शक्यता आहे. Shocking! LG snooping on CM n Ministers. Who visits CM n ministers- LG secretly collecting this info n informing PMO — Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) June 7, 2016