आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल हे एक नकारात्मक व्यक्ती असून त्यांचा प्रभाव अतिशय विषारी आहे, अशी विखारी टीका त्यांच्या एके काळच्या सहकारी आणि आता भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी केली आहे.
केजरीवाल यांच्याबरोबर भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात काम करत असतानादेखील आपले मतभेद होते, मात्र लोकपाल विधेयक आणण्याच्या समान ध्येयाचा विचार करून आपण संबंध तोडले नाहीत, असे त्या म्हणाल्या. अण्णा हजारे यांच्या आंदोलनात एकत्र काम करत असतानाही केजरीवाल यांच्या नकारात्मक दृष्टिकोनाचा अनुभव यायचा. मी केजरीवाल यांना म्हणायचे की या पत्रकार परिषदा, धरणे आंदोलन अशा गोष्टी करून सनसनाटी निर्माण करण्याची काही गरज नाही, असे बेदी यांनी सांगितले.
आपण दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारात कोणावर वैयक्तिक टीका करणार नाही, असे बेदी पूर्वी म्हणाल्या होत्या. पण आता आपल्याच विधानापासून त्या ढळल्या आहेत.