लालूप्रसाद यादव सर्वेसर्वो असलेल्या राष्ट्रीय जनता दलाच्या(आरजेडी) १३ आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
‘आरजेडी’तील २२ आमदारांपैकी तब्बल १३ आमदारांनी लालू प्रसाद यांना रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. या १३ आमदारांमध्ये ५ अल्पसंख्यांक समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱया आमदारांचा समावेश आहे. हे सर्व आमदार नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल पक्षात(जेडीयू) प्रवेश करणार आहेत.
‘आरजेडी’चे आमदार सम्राट चौधरी यांच्या निवासस्थानी या १३ आमदारांनी एकत्र येऊन विधानसभा अध्यक्षांना नितीश कुमार यांना पाठिंबा देत असल्याचे पत्र लिहीले आहे.
‘आरजेडी’चे आमदार जावेद इकबाल यांनी १३ आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
लोकसभा निवडणुकांच्या तोंडवरच लालूप्रसाद यांना १३ आमदारांनी झटका दिला आहे.  लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यात युती झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षात लालूंविरोधात प्रचंड असंतोष आहे. याचे पडसाद उमटण्यास सुरूवात झाल्याची ही लक्षणे आहेत.