भारतात वाघांची संख्या वाढल्याचे नुकतेच एका गणनेनुसार सरकारने जाहीर केले असले, तरी त्यात वापरण्यात आलेल्या संशोधन पद्धतीत अनेक उणिवा होत्या, असे ऑक्सफर्ड विद्यापीठातील एका अभ्यास अहवालात म्हटले आहे.
वाघांची गणना करताना हमखास पाहणी पद्धतीत काही चुका होतात असे संशोधकांचे म्हणणे आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ, भारतीय सांख्यिकी संस्था व वन्यजीव संवर्धन संस्था यांनी या व्याघ्रगणनेतील चुका दाखवून दिल्या आहेत. आताच्या अभ्यासात म्हणजे राष्ट्रीय व्याघ्र पाहणीत वाघांची संख्या ४ वर्षांत ३० टक्के वाढल्याचा दावा करण्यात आला आहे.
२०१४ मध्ये वाघांची २२२६ होती व ती २०१० या वर्षांपेक्षा तीस टक्क्य़ांनी वाढली आहे असा या पाहणीचा निष्कर्ष होता. ऑक्सफर्ड विद्यापीठातील वन्यजीव संवर्धन संशोधन संस्थेचे प्रा. अर्जुन गोपालस्वामी यांच्या मते या व्याघ्रगणनेत वापरलेले नमुने फारच कमजोर होते व केवळ १० टक्के अनिश्चिततेतून त्यावर मोठा परिणाम होणार होता. त्यामुळे वाघांची संख्या वाढल्याचा निष्कर्ष भक्कम पाहणीच्या आधारे नाही. आम्ही केलेल्या प्रत्यक्ष चाचण्यानुसार ही पाहणी पद्धत अतिशय चुकीचे निष्कर्ष सांगणारी होती, त्यात इंडेक्स कॅलिब्रेशन ही पद्धत विश्वासार्ह असून अगदी कमी प्रदेशातील वाघांची संख्या त्यात जास्त अचूकतेने सांगता येत. अ‍ॅनिमल ट्रॅक काउंट ही पद्धत कमी खर्चिक व फार चुका होणारी आहे त्यामुळे व्याघ्र गणनेच्या निष्कर्षांवर विश्वास ठेवणे कठीण आहे. वन्यजीव संस्थेचे व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे सदस्य डॉ. उल्लास कारंथ यांनी सांगितले, की या गणनेत सांख्यिकीच्या चुका आहे, नमुना, अंशाकन व भाकीत या सर्व मुद्दय़ांवर त्यात उणिवा आहेत.
आठ वर्षांत भारतात अनेक ठिकाणी वाघांची संख्या वाढली असेल पण ही वाढ ठरवणारी पद्धत प्रादेशिक व देश पातळीवर वाघांचे अचूक मापन करणारी नाही, असे कारंथ यांनी सांगितले.