सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत सत्तास्थापनेसाठी ११ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिल्यानंतर दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांना सोमवारी चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. तर, याआधी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सर्वांत मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले असल्याने भाजप सत्ता स्थापनेवर दावा सांगण्याची शक्यता आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा अल्पमतातील सरकार स्थापनेच्या विरोधात असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे भाजप दिल्लीत नव्याने निवडणूक घेण्याचा पवित्रा घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यपालांनी सत्ता स्थापनेसंदर्भातील चर्चेसाठी निमंत्रित केल्याच्या वृत्ताला काँग्रेस आणि ‘आप’ नेत्यांनी दुजोरा दिलेला आहे तर, भाजपने राज्यपालांकडून अद्याप कोणत्याही चर्चेचे निमंत्रण मिळाले नसल्याचे सांगितले.