विरोधी पक्षांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मीरा कुमार यांनी खासदार आणि आमदारांना भावनिक आवाहन केले. ‘राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करताना आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐका,’ असे भावनिक आवाहन मीरा कुमार यांनी केले आहे. संकुचित राजकीय हितांसाठी राष्ट्रपतीपदाचा वापर केला जाऊ शकत नाही, असेदेखील मीरा कुमार यांनी म्हटले आहे.

‘संविधानाने राष्ट्रपती पदावर बसलेल्या व्यक्तीला कायदे संमत करण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदावरील व्यक्ती संकुचित राजकीय हितांसाठी काम करु शकत नाही,’ असे मीरा कुमार यांनी म्हटले. ‘राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान करताना मतदारांनी आतला आवाज ऐकावा,’ असे आवाहन मीरा कुमार यांनी केले आहे. राष्ट्रपतीपदाचा अर्ज दाखल करण्यापूर्वी मीरा कुमार यांनी हा अर्ज दाखल केला आहे. २८ जून रोजी मीरा कुमार राष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. २८ जून ही राष्ट्रपतीपदासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

वसाहतींच्या विरोधात संघर्ष करण्यात आणि जाती प्रथांमुळे होणाऱ्या अत्याचारांविरोधात लढण्याचा अनुभव असल्याचे मीरा कुमार यांनी म्हटले. आजही जातीव्यवस्था कायम असून राजकारणातही तिचा प्रभाव दिसून येतो, असेदेखील मीरा कुमार यांनी म्हटले. ‘या दोन संघर्षांनी माझ्या संवेदनांवर, विचारांवर आणि माझ्या निर्णय क्षमतेवर मोठा परिणाम झाला. देशाच्या निर्मात्यांच्या विचारांचा माझ्यावर पगडा आहे. माझी राजकीय बांधिलकी कोणाशीही असली, तरी माझ्यावरील विचारांचा पगडा कायम आहे,’ असेदेखील कुमार यांनी सांगितले.

‘कितीही मतभेद असले तरी, जेव्हा मूल्यांच्या संरक्षणांचा आणि सामाजिक न्यायाची आवश्यकता असते, त्यावेळी आपल्या सर्वांचे लक्ष्य एकच असते. राष्ट्रपती पदावरील व्यक्ती भारतीय लोकशाहीचा कणा असलेल्या संविधानाच्या संरक्षणाची शपथ घेते. लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी आतापर्यंत अनेकांना संविधानाचा उपयोग झाला आहे. संकटकाळी संविधानच आपल्यासाठी मार्गदर्शक ठरले आहे,’ असेदेखील मीरा कुमार यांनी म्हटले.