स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांचे सहकारी हे महात्मा गांधींच्या हत्येच्या कटाचा भाग होते असे दर्शवणारा पुरावा असल्याचे नमूद करणाऱ्या जे. एल. कपूर आयोगाच्या अहवालावर काय कार्यवाही केली हे जाहीर करावे, असे निर्देश केंद्रीय माहिती आयोगाने पंतप्रधान कार्यालयाला दिले आहेत. ज्याप्रमाणे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित फाईल्स उघड करण्यात आल्या, त्याच धर्तीवर महात्मा गांधींबाबतचा र्सवकष कागदपत्रांचा संग्रह तयार करावा, अशीही शिफारस आयोगाने पंतप्रधान कार्यालयाला केली आहे. ३० जानेवारी १९४८ रोजी झालेली महात्मा गांधींची हत्या, त्याचा पुढील तपास आणि न्यायालयीन खटला यांच्याशी संबंधित रेकॉर्ड मिळावा यासाठी माहितीच्या अधिकाराखाली करण्यात आलेला अर्ज माहिती आयोगाने या कार्यालयाकडे पाठवला.महात्मा गांधींची हत्या, तिचा तपास, खटला, दोषींना देण्यात आलेली शिक्षा, अधिकृत पत्रव्यवहार आणि कपूर आयोगाच्या शिफारशींच्या आधारे केलेली कार्यवाही याबाबतची माहिती आणि ऐतिहासिक कागदपत्रे जतन करण्यासाठीची आवश्यक ती कार्यवाही याबद्दची याचिका पंतप्रधान कार्यालयाकडे वर्ग करण्यात यावी असे आयोगाने सांगितले. सावरकर कटात सहभागी? गांधी हत्या प्रकरणातील माफीच्या साक्षीदाराच्या कबुलीजबाबाला पूरक असा पुरावा न मिळालयने न्यायालयाने सावरकर यांना पूर्वी कटाच्या आरोपातून मुक्त केले होते. तथापि, ‘सावरकर व त्यांच्या गटाने गांधी हत्येचा कट रचला हीच गोष्ट या खटल्यातील वस्तुस्थितीचा एकत्रित विचार केल्यास दिसून येते असा निष्कर्ष न्या. कपूर यांनी काढला होता’, असे नमूद करणारा लेख प्रख्यात इतिहासतज्ज्ञ व वकील ए. जी. नूरानी यांनी ‘दि हिंदू’ या वृत्तपत्रात लिहिला होता. त्याचा संदर्भ आचार्यलु यांनी दिला.