दगडफेकीपासून बचाव करण्यासाठी काश्मिरी तरुणास जीपला बांधून त्याचा ढालीसारखा वापर करणाऱ्या मेजर नितीन गोगोई यांनी अखेर मौन सोडले आहे. निवडणूक अधिकारी आणि सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस यांना सुमारे बाराशे जणांच्या जमावाने घेरले होते. मी तरुणाला जीपला बांधले नसते तर जमावाच्या हल्ल्यात अनेकांचे प्राण गेले असते असे मेजर गोगोई यांनी म्हटले आहे.

काश्मीर खोऱ्यात निदर्शकांकडून सुरक्षा दलाच्या पथकावर होणाऱ्या दगडफेकीपासून बचाव करण्यासाठी मेजर नितीन गोगोई यांनी एका निदर्शकालाच जीपला बांधले होते. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर प्रकरणाची चौकशी सुरु झाली होती. सोमवारी मेजर गोगोई यांना घुसखोरी प्रतिबंधक कारवाईच्या प्रयत्नांसाठी लष्कराने प्रशंसापत्राने सन्मानित केले होते. यावरुनही वाद निर्माण झाल्यानंतर अखेर मेजर गोगोई यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांसमोर त्यादिवशी नेमके काय झाले होते याचा उलगडा केला.

[jwplayer mxWbhw09-1o30kmL6]

मेजर गोगोई सांगतात, गुंडीपूरापासून दीड किलोमीटरवर असलेल्या एका गावात जमावाने मतदान केंद्राला घेरल्याचे माहिती मला मिळाली होती. त्यांच्या सुटकेसाठी मी तिथे जाण्यासाठी निघालो. मतदान केंद्रावर अडकलेल्या कर्मचाऱ्यांकडून आम्हाला सातत्याने फोन येत होते. मला माझे कर्तव्य पार पडणे महत्त्वाचे वाटल्याने मी तिथे पोहोचणे महत्त्वाचे होते असे त्यांनी नमूद केले. पण जमावामुळे आम्हाला मतदान केंद्राजवळही जाता येत नव्हते. आमच्यापासून ३०- ४० मीटरवर एक तरुण होता, तो भारतविरोधी घोषणा देत जमावाला चिथावणी देत होता. मग आम्ही याच तरुणाला ताब्यात घेऊन जमावावर नियंत्रण मिळवण्याचा निर्णय घेतल्याचे गोगोई यांनी सांगितले.

[jwplayer hxATNALn-1o30kmL6]

आम्हाला बघून हा तरुण बाईकवर बसून पळण्याचा प्रयत्न करत होता. आम्ही त्याचा पाठलाग सुरु केला. यादरम्यान आमच्यावर जमावाकडून दगडफेक सुरु होती, मी आणि माझे काही सहकारी यात किरकोळ जखमी झालो होतो असे गोगोईंनी नमूद केले. पण त्यानंतरही आम्ही त्याला पकडले. या तरुणाचे नाव फारुख अहमद दार असे होते. आम्ही फारुखला पकडताच जमाव मागे झाला. शेवटी आम्ही मतदान केंद्रावर गेलो, तिथे अडकलेल्या १२ जणांची सुटका करुन आम्ही परतत होते. मात्र मशिदीत घोषणा झाल्याने मतदान केंद्राबाहेर पुन्हा गर्दी वाढली. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी गोळीबार करण्याची परवानगी द्या असे माझे सहकारी सांगत होते. पण गोळीबार केल्यास अनेकांचे प्राण गेले असते. मग फारुखला जीपला बांधल्यास जमावातून बाहेर पडता येईल असा विचार माझ्या डोक्यात आला आणि मी त्याला जीपला बांधण्याचे आदेश दिले. यानंतर जमाव मागे हटला आणि आम्ही सगळेजव सुखरुप तिथून बाहेर पडलो असे गोगोईंनी स्पष्ट केले. मला मिळालेला पुरस्कार माझ्या सेवेसाठी असून या घटनेसाठी मला पुरस्कार मिळाला नाही असेही त्यांनी नमूद केले.