मालदीवचे माजी अध्यक्ष मोहम्मद नशीद यांच्या अटक वॉरण्टसंबंधी द्विपक्षीय चर्चेचा मार्ग न अनुसरता भारताने त्यावर जाहीर वाच्यता केली, ही बाब दुर्दैवी असल्याची टीका मालदीवने गुरुवारी केली. लोकशाही संस्थांचे भारताकडून उल्लंघन होत असल्याचाही आरोप मालदीवने केल्यामुळे एकूणच या प्रकरणास गंभीर वळण लागले आहे. दरम्यान, भारताचे परराष्ट्रमंत्री सल्मान खुर्शीद यांनी मालदीवच्या परराष्ट्रमंत्र्यांशी या संदर्भात विस्तृत चर्चा केल्याचे वृत्त आहे. दोन सरकारांमध्ये द्विपक्षीय चर्चेचा मार्ग न अनुसरता भारताने या प्रकरणाची जाहीर वाच्यता करणे दुर्दैवी आहे, असे मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले. मोहम्मद नशीद हे अजूनही येथील भारतीय दूतावासातच आहेत. दरम्यान, भारताचे परराष्ट्रमंत्री सल्मान खुर्शीद यांनी मालदीवचे परराष्ट्रमंत्री अब्दुल सामद अब्दुल यांच्याशी या मुद्दय़ावर गुरुवारी प्रदीर्घ चर्चा केली.