पाकिस्तानी अतिरेक्यांवर सुरक्षा दलांकडून धडक कारवाई केली जात असून सीमेवरील घुसखोरीचाही बीमोड करण्यात सरकारला यश येत आहे. घुसखोरीचा प्रयत्न करणारे ३० अतिरेकी गेल्या तीन महिन्यांत चकमकीत ठार झाले आहेत, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बुधवारी येथे वार्ताहरांना सांगितले.
चकमकीत एक जवान आणि काही पोलीस ठार झाले असले तरी अतिरेक्यांची हानी लक्षणीय आहे, असेही त्यांनी सांगितले. पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमाबाबतच्या ताज्या माहितीबाबत पर्रिकर म्हणाले की, अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या करारास आपला पूर्ण पाठिंबा आहे, मात्र आपला देश प्रत्येक क्षेत्रात त्यांच्यापेक्षा सक्षम आणि सज्ज आहे. चीनबरोबरची चर्चाही सकारात्मकपणे सुरू आहे. अर्थात जोवर आपण संरक्षणदृष्टय़ा तसेच आर्थिकदृष्टय़ा बळकट होत नाही, तोवर हे संबंध खऱ्या अर्थाने सुधारणार नाहीत. त्यामुळेच शेजाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच आम्हीही आमची ताकद वाढवीत आहोत, असेही पर्रिकर म्हणाले.