मर्सल’ या तामिळी चित्रपटावरून सध्या देशाचे राजकारण चांगलेच तापले आहे. या चित्रपटातील काही संवाद वस्तू आणि सेवा कर (जीएसटी), डिजिटल इंडिया या सरकारी योजनांविषयी नकारात्मक टिप्पणी करणारे आहेत. त्यामुळे या चित्रपटावर भाजपने आक्षेप घेतला होता. मात्र, यावरून भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी स्वपक्षीयांना चांगलेच सुनावले आहे. देशातील काही लोक जीएसटीच्या निर्णयाला पाठिंबा देतात, काहीजण देत नाहीत. नोटाबंदीलाही काहींचा पाठिंबा आहे तर काहीजणांचा नाही. मात्र, याचा अर्थ असा होत नाही की, सरकारी धोरणांवर टीका करणारे लोक देशद्रोही आहेत. साहजिकच सिन्हा यांच्या वक्तव्यामुळे भाजपचे नेते चांगलेच तोंडघशी पडले आहेत.

तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील ‘मर्सल’ चित्रपटाच्या मुद्द्यावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. चित्रपट हे तामिळनाडू संस्कृती आणि भाषेच्या अभिव्यक्तीचे सशक्त माध्यम आहे. त्यामुळे ‘मर्सल’ चित्रपटाच्याबाबतीत हस्तक्षेप करून तामिळी स्वाभिमान दुखावण्याचा प्रयत्न करू नका, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

तर माजी केंद्रीय अर्थमंत्री यांनीही ट्विटरवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. चिदंबरम म्हणतात, सर्व चित्रपट निर्मात्यांसाठी महत्त्वाची सूचना, यापुढे फक्त सरकारी धोरणांचे कौतुक करणाऱ्या चित्रपटांनाच परवानगी दिली जाईल. ‘मर्सल’ चित्रपटातील दोन दृश्ये वगळण्याची मागणी भाजपने केली आहे. ‘परासक्ती’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला असता तर काय झाले असते असा प्रश्नही त्यांनी ट्विटरद्वारे उपस्थित केला. ‘परासक्ती’ हा तामिळ चित्रपट १९५२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात हिंदू धर्मावर भाष्य करण्यात आले होते. यामुळे चित्रपटावर टीकाही झाली होती. अभिनेता विजयचा ‘मर्सल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटातील दोन दृश्यांवर भाजपचा आक्षेप आहे. या दृश्यांमुळे जीएसटी आणि डिजिटल इंडियाविषयी गैरसमज निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळे ती दृश्ये वगळण्यात यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष टीएन सौंदरराजन यांनी केली होती. त्यामुळे आता भाजप या सर्व टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.