सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याच्या पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या प्रयत्नांना सुरुंग लावण्याच्या इराद्याने तालिबान्यांनी रविवारी मध्यरात्री कराचीतील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या सशस्त्र हल्ल्याने संपूर्ण पाकिस्तान हादरला. दहशतवादी हल्ल्यात १२  दहशतवाद्यांसह  २८ जण  ठार झाले. तब्बल १३ तासांच्या चकमकीनंतर दहशतवाद्यांचा पाडाव करण्यात लष्कराला यश आले.
दरम्यान, ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बॉम्ब आणि गोळ्यांच्या मदतीने निष्पाप जिवांचा बळी घेऊन पाकिस्तान सरकारला आम्ही जिवंत आहोत, हे दाखवून दिले आहे, अशी दर्पोक्ती संघटनेचा म्होरक्या शहिदुल्लाह शहीद याने केली आहे. ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’चा माजी म्होरक्या हकिमुल्लाह मेहसूद यांच्या हत्येचा हा बदला असल्याचे त्याने स्पष्ट केले. पाकिस्तानातील तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि सरकार यांच्यात शांतता बोलणी फिसकटल्यानंतर हा हल्ला करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
लष्करी वेषातील दहशतवाद्यांनी विमानतळाच्या इमारतीत प्रवेश केला. या वेळी त्यांनी अत्याधुनिक शस्त्रांमधून विमानतळ कर्मचारी, तसेच प्रवाशांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यात सैनिक, अभियंते, कर्मचारी आणि पोलीस ठार झाले. दहशतवाद्यांनी काही ठिकाणी स्फोटकांचा वापर केल्याने काहीजण जखमी झाले, तर इमारतीचे नुकसान झाले.
पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसीफ यांनी हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध केला.
शांती भंग करण्यासाठी संघटनेने केलेला हा हल्ला म्हणजे भ्याडपणा आहे. देशाची प्रमुख सरकारी केंद्रे उद्ध्वस्त करून जनतेत अस्थिरता निर्माण करण्याचा त्यांचा इरादा होता. परंतु आमच्या लष्कराने तो हाणून पाडला, असे ते म्हणाले.  
मे २०११ मध्ये या संघटनेने मेहरन नौदल हवाईतळावर असाच हल्ला केला होता, त्यात १५ दहशतवादी सामील होते, त्यांनी १८ जणांना ठार केले होते. या वेळी त्यांनी बदल्याची भाषा केली होती.

काय घडले..
* रविवारी मध्यरात्री शस्त्रधारी दहशतवाद्यांचा स्फोटकांसह विमानतळावर प्रवेश
* दोन गटांत विभागलेल्या दहा दहशतवाद्यांचा कर्मचाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार
* कारवाईत १२ दहशतवादी ठार
* सहा तास विमानतळ बंद
* लष्करी कारवाईनंतर विमानतळावर अत्याधुनिक शस्त्रसाठा जप्त
* १३ तास चकमक

तेहरीक ए तालिबान पाकिस्तान या संघटनेला सरकारचे कोणतेही नियंत्रण अमान्य आहे. देशात लोकशाहीऐवजी शरीयत कायदा लागू करून त्यानुसार जनतेला वागवण्याचा या संघटनेचा निर्धार आहे. यासाठी पाकिस्तानातील सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणांवर दहशतवादी हल्ला घडवून आणून परिस्थती अस्थिर करण्याचे प्रयत्न या संघटनेकडून वारंवार घडतात. शांतता बोलणी फिस्कटल्याने आम्ही हा बदला घेतला आहे.

जखमा बरी करणारी उपकरणे हस्तगत
कराची : बंदुकीच्या गोळीने झालेल्या जखमा केवळ काही सेकंदांत बरी करणारी ‘एक्सस्टॅट’ उपकरणे कराची विमानतळावर हल्ला करणाऱ्या तेहरिक-ए-तालिबानच्या दहशतवाद्यांकडे होती. त्यावरून या दहशतवाद्यांची दीर्घ काळ हल्ला करण्याची योजना असल्याचे स्पष्ट होते, असे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.
बंदुकीची गोळी लागल्यानंतर होणारा रक्तस्राव थांबवून जखम १५ ते २० सेकंदांत बरी करणारी उपकरणे दहशतवाद्यांकडून वापरण्यात आली. सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना एक्सस्टॅट किंवा फॅक्सिएट उपकरणे दहशतवाद्यांच्या पिशव्यांमध्ये मिळाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
विमानतळावर दीर्घ काळ हल्ला करण्याच्या उद्देशाने हे दहशतवादी आले होते, हे त्यावरून स्पष्टपणे सूचित होते. सदर उपकरणे लष्करी आणि तातडीच्या सेवेसाठी वापरली जातात.
स्पंजचा अंतर्भाव असलेली ही उपकरणे जखमेवर लावताच सदर स्पंज तातडीने रक्त शोषून घेतात, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षेत वाढ
नवी दिल्ली : पाकिस्तानातील कराची विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
दिल्ली पोलीस आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे कर्मचारी यांची संयुक्त सुरक्षा दिल्लीतील विमानतळावर तैनात करण्यात आली असून प्रचलित पद्धतीनुसार कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रवाशांची कसून तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.इंदिरा गांधी विमानतळावरील दोन्ही टर्मिनलजवळच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर  अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली असून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.विमानतळाबाहेरील सुरक्षा दिल्ली पोलिसांच्या कार्यकक्षेत आहे तर अंतर्गत सुरक्षा केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कार्यकक्षेत आहे.