आसाममधील घटना

राजस्थानात गोरक्षकांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता आसाममध्ये गायींची चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तरुणांचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

आसामातील नागाव जिल्ह्य़ातील कासामारी या गावानजीक गुरे चरत असताना विशी-पंचविशीतील दोन तरुण त्यातील दोन गायींची चोरी करत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. ग्रामस्थांनी या दोन तरुणांना हटकले. त्यानंतर जमावाने दोन्ही तरुणांना बेदम मारहाण केली. जबर जखमी अवस्थेत या दोन्ही तरुणांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तरुणांच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

नागावचे पोलीस अधीक्षक देबराज उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी जमाव दोन्ही तरुणांना मारहाण करत होता. तरुणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता दीड किमी अंतरापर्यंत जमावाने त्यांचा पाठलाग केला. मारहाणीत दोन्ही तरुण जबर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. गोरक्षकांच्या मारहाणीत दोघांचा मृत्यू झाला किंवा कसे, याबाबत विचारले असता अद्याप तरी तशी तक्रार आपल्याकडे आली नसल्याचे उपाध्याय म्हणाले. आसामात गुरांची चोरी करण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. मात्र, असा प्रयत्न करणाऱ्यांना मारहाण होऊन त्यात मृत्यू होण्याची घटना प्रथमच घडत असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. या घटनेची निष्पक्ष चौकशी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.