पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी 'स्मार्ट सिटी' योजनेसाठी निवड करण्यात आलेल्या ९८ शहरांची अंतिम यादी गुरूवारी केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत जाहीर करण्यात आली. देशातील शंभर शहरांचा नियोजनबद्ध विकास करण्याच्या प्रयोजनाने सुरू करण्यात आलेल्या 'स्मार्ट सिटी' योजनेच्या अंतिम यादीत महाराष्ट्राच्या दहा शहरांना स्थान मिळाले आहे. मुंबई, नवी मुंबई, नाशिक, ठाणे, अमरावती, सोलापूर, नागपूर, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद, पुणे या शहरांचा यादीत समावेश करण्यात आला आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडचे नाव यादीतून वगळण्यात आले आहे. राज्य सरकारने शिफारस केलेल्या यादीत पिंपरी-चिंचवडचाही समावेश करण्यात आला होता. परंतु, केंद्राकडून गुरूवारी जाहीर झालेल्या अंतिम यादीत राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवडला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका आणि राजकीय श्रेय घेण्याच्या दृष्टीने शहरांची निवड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, या यादीत उत्तर प्रदेशमधील सर्वाधिक १३ शहरांचा, तर तामिळनाडूतील १२, मध्य प्रदेशमधील ७, गुजरातमधील ६, पश्चिम बंगाल व राजस्थानधील ४, आणि बिहार व आंध्र प्रदेशमधील प्रत्येकी ३ शहरांचा 'स्मार्ट सिटी'मध्ये समावेश आहे. 'स्मार्ट सिटी' योजनेकरवी केंद्राकडून मिळणाऱ्या अधिकच्या निधीचा या शहरांच्या विकासासाठी राज्यांच्या सरकारांना उपयोग करता येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून निवड झालेल्या शहरांतील आरोग्य, शिक्षण, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण, वाहतूक व्यवस्था इत्यादी पायाभूत सुविधांच्या नियोजनबद्ध विकासावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष निधी मिळणार आहे.