राष्ट्रीय जनता दलाचे ( राजद) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी सततच्या परदेश दौऱ्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. नरेंद्र मोदी हे आता ‘एनआरआय’ बनले आहेत. त्यामुळे जागतिक नेत्यांनी मोदींसाठी जगाचा पंतप्रधान असे पद निर्माण करावे, अशा शब्दांत लालूंनी मोदींवर टीका केली. चारा घोटाळ्याच्या खटल्याच्या सुनावणीसाठी रांची येथील विशेष सीबीआय न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी आले असताना ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत. मात्र, ते बहुतांश वेळ भारताबाहेरच असतात. त्यामुळे मी जागतिक नेत्यांना विनंती करतो की, त्यांच्यासाठी जागतिक पंतप्रधानाचे पद तयार करावे. नरेंद्र मोदी त्या पदावर शोभून दिसतील, असे लालूंनी आपल्या खास शैलीत सांगितले.