लालूप्रसाद यादव यांची भाजपवर टीका

परदेशातील बँकांमधील काळा पैसा भारतात आणण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची इच्छा नसल्याचा आरोप ‘राजद’चे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी आज केला. सत्तेत येण्यापूर्वी मोदी यांनी हा पैसा देशात परत आणण्याचा शब्द जनतेला दिला होता. आता तो पाळताना ते आणि त्याचा पक्ष कुठे दिसत नाही, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली.
लालू यांनी केलेल्या ‘ट्विट’मध्ये काळा पैसा परत आणण्याचा मुद्दा सोडाच पंतप्रधान मोदी हे आपल्या भांडवलवादी मित्रांचा बचाव करण्यात दंग आहेत. त्यातच त्यांचे हित आहे. भाजपच्याच काही नेत्यांचा काळा पैसा परदेशात सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. काळ्या पैशाच्या बळावरच भाजपला बिहारमधील हारलेली लढाई जिंकायची आहे. राज्यात भाजपचा पराभव ठरलेला आहे, असे लालू म्हणाले. बिहारच्या जनतेला भाजपचा खरा चेहरा माहित पडला आहे. त्यामुळे त्यांना आता फसवता येणार नाही. भाजप ही निवडणूक हरण्यासाठीच लढत असल्याचे लालू यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे. परदेशातील बँकांमध्ये असलेला काळा पैसा भारतात परत आणल्यास प्रत्येकाच्या खात्यात किमान १५ ते २० लाख रुपये भरता येतील, या नरेंद्र मोदी यांनी केलेल्या दाव्याची विरोधी पक्षांनी खिल्ली उडवली.