पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या पद्धतीत काही नवे बदल सुचवले आहेत. त्यासाठी मोदींनी अधिकाऱ्यांना एक मंत्र दिला आहे. त्यानुसार भविष्यात कोणतेही सरकारी काम करताना त्यामध्ये संवाद, कार्यक्षमता आणि नवनिर्मिती हे निकष महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यादृष्टीने कामकाजाची पद्धत सुधारण्यासाठी प्रत्येक सरकारी विभागाला अतिरिक्त निधी देण्यात येईल. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना महिन्यातील पाच ते सहा दिवस फिल्डवर्क करण्याच्या सूचना पंतप्रधान मोदींनी दिल्या आहेत. तीन आठवड्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिरिक्त सचिव आणि सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यामध्ये मोदींनी सरकारी कामाचा वेग वाढावा, यासाठी आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना केल्या होत्या. दरम्यान, कॅबिनेट सचिव पी. के. सिन्हा यांनी सर्व मंत्र्यांच्या सचिवांना पत्र लिहून बैठकीत चर्चा झालेल्या ३९ मुद्द्यांबाबत माहिती दिली. या मुद्द्यांना अनुसरुन कामे करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच काम नियोजित पद्धतीने सुरू आहे किंवा नाही, हे तपासण्यासाठी अहवाल सादर करण्याचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पंतप्रधानांनी सुचवलेल्या या त्रिसुत्रीमुळे सरकारी कामकाज सुधारण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर आणखी एका महत्वपूर्ण गोष्टीचा सिन्हा यांनी आपल्या पत्रात उल्लेख केला तो म्हणजे, कार्यालयीन कामाची पद्धत किंवा त्यासाठी काढण्यात येणाऱी कार्यालयीन परिपत्रके आणि आदेशांमध्ये बदल करण्यात यावेत. यामध्ये एकाच विषयावरील अनेक परिपत्रकांऐवजी एकच परिपत्रक जारी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. तसेच बैठकींचे इतिवृत्त देण्यासाठी ४८ तासांपेक्षा जास्त काळ लागता कामा नये. यासाठीचा कालावधी कमी करण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.