मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह राज्यातील सतरा भागांतील हवा आरोग्याला हानीकारक देशातील सर्वाधिक प्रदूषित ९४ शहरांमध्ये महाराष्ट्रातील सतरा शहरांचा समावेश असून या सतरा शहरांमध्ये मुंबई, नवी मुंबई, बदलापूर, उल्हासनगर आणि पुण्याचा समावेश आहे. २०११ ते २०१५ दरम्यानच्या कालावधीमध्ये केलेले सर्वेक्षण आणि चाचण्यांमधून राज्यातील सतरा शहरांमधील हवेमध्ये पार्टिक्युलेट मॅटर (पीएम १०) या प्रदूषित घटकाचे प्रमाण निश्चित पातळीपेक्षा किती तरी अधिक असल्याचे आढळून आले आहे. याशिवाय पुणे, बदलापूर आणि उल्हासनगर या शहरांमध्ये पीएम १० बरोबरच नायट्रोजन डायऑक्साइड (एनओ२) याही प्रदूषक घटकाची पातळी प्रमाणापेक्षा अधिक आहे. केंद्रीय प्रदूषण नियत्रंण मंडळाने हे सर्वेक्षण केले आहे. प्रदूषण रोखण्यासाठी पावले टाकण्याच्या सूचना या शहरांना केल्या असल्याचे केंद्रीय वने व पर्यावरणमंत्री अनिल माधव दवे यांनी मंगळवारी सांगितले. केंद्राने निश्चित केलेल्या मानकानुसार, ‘पार्टिक्युलेट मॅटर १०’चे वार्षिक सरासरी प्रमाण ६० आणि नायट्रोजन डॉयऑक्साइडचे वार्षिक सरासरी प्रमाण ४०पेक्षा अधिक असल्यास त्या शहरांना प्रदूषित शहरे म्हटले जाते. राज्यातील सतरा शहरांमध्ये २०११ ते २०१५ या कालावधीमध्ये पीएम १० आणि एनओ२चे प्रमाण सातत्याने या पातळीपेक्षा अधिक राहिले आहे. इतर राज्ये कुठे? महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेशातील पंधरा, पंजाबमधील आठ, निसर्गसुंदर हिमाचल प्रदेशामधील सात शहरांचा समावेश आहे. याउलट औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामध्ये महाराष्ट्राशी स्पर्धा करणाऱ्या गुजरातमधीलफक्त सूरत, तामिळनाडूमधील तुतीकोरीन, कर्नाटकातीलचार (बंगळुरू, गुलबर्गा, दावणगिरी, हुबळी- धारवाड) आणि आंध्र प्रदेशातील पाच शहरे (गुंटूर, कर्नूल, नेल्लोर, विजयवाडा आणि विशाखापट्टणम) प्रदूषित आहेत. या शहरांतील हवा भीषण अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर, उल्हासनगर