देशात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुर्दैवी अपघातात दोघांना आपला प्राण गमवावा लागला. पहिला अपघात हा बिहारमधील सासाराम येथे घडला. तिथे रेल्वे ट्रॅकवर बनत असलेला पुल पडल्याने एका मजुराचा मृत्यू तर दोघेजण जखमी झाले आहेत. तर दुसरी दुर्दैवी घटना मुंबई येथे घडली. मॉर्निंग वॉकला बाहेर पडल्यानंतर अचानक अंगावर नारळाचे झाड पडल्याने एका महिलेचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. महिलेचे नाव कांचन नाथ असे होते. त्या ५८ वर्षांच्या होत्या. कांचन पूर्वी दूरदर्शनमध्ये निवेदिका होत्या. त्याचबरोबर त्या योगासने ही शिकवत असत. नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला गेल्यानंतर अचानक ही घटना घडली. ही घटना शुक्रवारी (दि.२१) सकाळच्या सुमारास घडली होती.

झाड पडल्यानंतर त्या तिथेच निपचित पडल्या होत्या. परिसरातील लोकांनी त्वरीत त्यांना रूग्णालयात दाखल केले. दोन दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले. पण त्यांच्यावरील उपचाराला यश आले नाही. अखेर त्यांचा आज मृत्यू झाला.