जगातील अन्य मुसलमानांच्या तुलनेत भारतातील मुसलमान अधिक सुरक्षित असून, भारतातील बहुसंख्य हे उदारमतवादी असल्याचे मत भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी येथे व्यक्त केले. विराट हिंदू समावेशाच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, हिंदू हे मुळातच उदारमतवादी असल्याने देशसुध्दा उदारमतवादी आहे आणि म्हणूनच जगभरातील मुसलमानांपेक्षा भारतातील मुसलमान अधिक सुरक्षित आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या मदर तेरेसांबाबतच्या व्यक्तव्याला दुजोरा देत, गरिबांच्या सेवेच्या नावावर धर्मांतरण करणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी प्रमुख प्रवीण तोगडीया यांच्या बंगळुरूमधील प्रवेश बंदीसाठी त्यांनी कर्नाटकमधील काँग्रेस सरकारवर टीका करत हा निर्णय चुकीचा असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.