निरोपाच्या भाषणात राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचा मोदी सरकारला सल्ला

‘सहिष्णुतेच्या मूल्याच्या आधारावरच आपला देश बलशाली झाला आहे. दयाबुद्धी, सहानुभूतीची सदैव जागती भावना हा आपल्या देशाच्या संस्कृतीचा मूलाधार आहे. मात्र आज आपल्या समाजात, अवतीभवती वाढता हिंसाचार आपण बघत आहोत. हा हिंसाचार – मग तो शाब्दिक असो वा शारीरिक – रोखायलाच हवा’, असा  सल्ला मावळते राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी सोमवारी आपल्या निरोपाच्या भाषणात केंद्रातील मोदी सरकारला दिला.

केंद्रातील राजकारणात प्रदीर्घ खेळी खेळणारे व राष्ट्रपतिपदाने त्या खेळीचा कळसाध्याय गाठणारे प्रणब मुखर्जी आज, मंगळवारी सर्वोच्च घटनात्मक पदावरून निवृत्त होत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे रामनाथ कोविंद हे आज राष्ट्रपतिपदाची सूत्रे हाती घेतील. निवृत्तीच्या आदल्या दिवशी, सोमवारी दूरचित्रवाहिन्यांवरून देशवासीयांशी संवाद साधताना प्रणब मुखर्जी यांनी विविध मुद्दय़ांवर उहापोह केला. हा संवाद साधताना मुखर्जी यांनी कुठल्याही विशिष्ट घटनेचा उल्लेख केला नाही; मात्र, कथित गोरक्षकांचा वाढता हिंसाचार, जातीवादातून उसळणारी हिंसा आदींचा संदर्भ त्यांच्या बोलण्याला होता. त्यातून त्यांनी मोदी सरकारला त्याच्या कर्तव्याची जाणीव पुन्हा एकदा करून दिली.

देशातील विविधता व सहिष्णुता या दोन मूल्यांवर राष्ट्रपतींनी आपल्या बोलण्यात अधिक भर दिला. ‘आज आपण आपल्याभोवती वाढता हिंसाचार बघत आहोत. या हिंसाचाराच्या केंद्रस्थानी काळोख, भय व अविश्वास या गोष्टी आहेत. मात्र या हिंसाचारापासून आपला समाज मुक्त असायला हवा. लोकशाही व्यवस्थेत सर्वच स्तरांतील नागरिकांना सामावून घेण्याची ताकद फक्त अहिंसक समाजातच असू शकते. समोरच्याप्रती दयाभावना असलेल्या व्यक्तींचा, समोरच्याची काळजी घेणाऱ्या व्यक्तींचा समाज घडवायचा तर अहिंसेला बळ देणे आवश्यक आहे’, असे मुखर्जी यांनी नमूद केले. ‘भारताचे अस्तित्व केवळ भौगोलिक अस्तित्वापुरते मर्यादित नाही. नानाविध संकल्पना, विचारसरणी, प्रतिभा, अनुभव यांचा भरभक्कम इतिहास या देशाला आहे. अनेकविध कल्पनांच्या शतकानुशतके झालेल्या एकजीवीकरणातून या देशातील वैविध्य जन्मास आले आहे’, याकडे मुखर्जी यांनी लक्ष वेधले. ‘संस्कृती, श्रद्धा, भाषा यांतील वैविध्यामुळे भारताची स्वतची अशी अनोखी ओळख निर्माण झाली आहे’, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. महात्मा गांधी यांचे स्मरण करून देत, सर्वसमावेशक अशा समाजाची निकड मुखर्जी यांनी अधोररेखित केली. ‘आर्थिक आघाडीवर विकासाची फळे समाजातील अगदी शेवटच्या माणसालाही चाखता आली पाहिजेत’, असेही ते यावेळी म्हणाले.

‘मतभिन्नतेचा अधिकार मोलाचा’

‘समाजात एखाद्या मुद्दय़ावर विविध मतप्रवाह असू शकतात. एखादी गोष्ट आपल्याला पटेल, वा पटणार नाही. मात्र, मतभिन्नतेचा अधिकार आपण नाकारू शकत नाही. तो नाकारला तर आपल्या विचारप्रक्रियेचा मूलाधारच नाहीसा होईल’, असा इशारा मुखर्जी यांनी दिला.