पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या निवासस्थानी कुख्यात दाऊद इब्राहिमला भेटल्याचा दावा उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी केला होता. खान यांचा हा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सिद्ध करावा, अन्यथा त्यांच्या या बाष्कळ वक्तव्यासाठी माफी मागावी असे भाजपने अखिलेश यादव यांना सुनावले आहे.
मुझफ्फरनगरमधील दंगलप्रकरणी भाजपने आझम खान यांच्यावरही टीका केली आहे. अखिलेश यादव सरकारचे अपयश लपविण्यासाठी खान यांनी असे वक्तव्य करून राजकारण सुरू केल्याचे भाजपने म्हटले आहे. खान यांनी वक्तव्य सिद्ध करावे किंवा अखिलेश यादव यांनी त्यांच्या बिनबुडाच्या वक्तव्यासाठी माफी मागावी, असे भाजपचे राष्ट्रीय चिटणीस श्रीकांत शर्मा यांनी म्हटले आहे.
मुझफ्फरनगरमधील दंगल आझम खान यांनीच घडविली असून त्यांच्या दबावामुळे पोलीस कारवाई करण्यात अपयशी ठरले, असा दावाही शर्मा यांनी केला आहे. समाजाची विभागणी करणे आणि स्वत:चा मतदारसंघ जपणे हेच खान यांचे काम असल्याचेही शर्मा यांनी म्हटले आहे.