नरेंद्र मोदींची कार्यपद्धती आत्मकेंद्री आहे. अशा पद्धतीने देशाचा कारभार हाकता येणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी केली. स्वतःच्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध केलेल्या नव्या पोस्टमध्ये त्यांनी पुन्हा एकदा मोदींना लक्ष्य केले.
या पोस्टमध्ये पवार म्हणतात, नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धतीच आत्मकेंद्री आहे. अशा पद्धतीने देशाचा कारभार हाकता येत नाही. देशासाठी धोरणं ठरवताना, योजना आखताना सहकाऱ्यांना विश्वासात घ्यावं लागतं. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळवावी लागते. योजना केंद्राच्या असल्या, तरी राबवतात राज्यंच. त्यामुळे केंद्र सरकारला प्रत्येक राज्यातल्या मुख्यमंत्र्यांसोबत काम करावं लागतं. कृषिमंत्री म्हणून मी नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, नितीशकुमार यांच्या बैठका घेतल्या आहेत.