जनशताब्दी वर्षांनिमित्त गुरूंना मोदींची शब्दांजली; सहकार चळवळीचे पुनरूज्जीवन करण्याची गरज ‘दिवंगत लक्ष्मणराव इनामदार ऊर्फ वकीलसाहेब कधी प्रसिद्धीच्या झोतात आले नाहीत, दूरचित्रवाहिन्यांवर चमकले नाहीत. त्यांची वाहवा कधी कुणी केली नाही.. पण एका साधकासारखे ते समर्पित जीवन जगले. स्वत:ला देशसेवेसाठी वाहून घेण्याच्या एका महान पंरपरेचे ते अनमोल रत्न होते,’ अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या गुरूंना गुरुवारी शब्दांजली वाहिली. निमित्त होते ते इनामदार यांच्या जन्मशताब्दी वर्षांच्या प्रारंभाचे. इनामदार यांच्या सहकार चळवळीतील योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांच्या जन्मशताब्दी सोहळा विज्ञानभवनात आयोजित केला होता. या वेळी संघ परिवारातील ज्येष्ठ नेते आवर्जून उपस्थित होते. हा कार्यक्रम कृषी मंत्रालय व संघपरिवारातील सहकार भारती या संस्थेने आयोजित केला होता. मूळचे सातारा जिल्ह्यातील खटावचे रहिवासी असलेल्या लक्ष्मणराव इनामदारांनी गुजरातेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रुजविला होता. आपल्याला संघाच्या शाखेत आणणारे आणि संघ संस्कार करणारे लक्ष्मणरावच होते, असे मोदी आवर्जून सांगतात आणि तसे त्यांनी ‘ज्योतिपुंज’ या पुस्तकामध्ये लिहिलेदेखील आहे. लक्ष्मणरावांचे नावसुद्धा कधी ऐकले नाही तरी तुम्ही त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करत असल्याचे सांगून काही जण नाके मुरडतील, अशी टिप्पणी करून ते म्हणाले, ‘नाव ऐकलेले नाही, हीच तर खरी कमाल आहे. स्वत: मागे राहून, देशसेवेसाठी व्यक्तिनिर्माण करण्याचा मार्ग त्यांनी अनुसरला आणि सहकार चळवळीचा तर तो मूलमंत्र आहे. आपल्या आदर्शासाठी ते जीवनभर जगले. एका ज्योतीने हजारो ज्योती पेटविण्याचे कार्य त्यांनी केले. ते अनोळखी राहिले, म्हणून त्यांचे मूल्य कमी होत नाही. त्यांनी अनेकांना घडविले. साधे जीवन आणि स्वत: मागे राहून सहकाऱ्यांना प्रेरणा देण्याची त्यांची वृत्ती महान पंरपरेला गौरवान्वित करणारी होती. ते देशाचे अनमोल रत्न होते.’ या वेळी मोदींनी सहकार चळवळीमध्ये पुन्हा नव्याने प्राण फुंकण्याचे आवाहन केले.