भारताचा सर्वोच्च नागरी बहुमान समजल्या जाणाऱ्या ‘भारतरत्न’ पुरस्कारासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि स्वातंत्र्यसैनिक सुभाषचंद्र बोस यांची नावे निश्चित करण्यात आल्याचे समजते. ‘भारतरत्न’ पुरस्कारासाठी गृहमंत्रालयाकडे आलेल्या प्रस्तावांपैकी पाच नावे निश्चित करण्यात आल्याची चर्चा आहे. यापूर्वी अनेकदा वाजपेयी यांना भारतरत्न देण्याची मागणी करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांची इच्छा यानिमित्ताने पूर्ण होण्याची शक्यता आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी या नावांची घोषणा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा सरकारतर्फे पाच जणांना भारतरत्न पुरस्कार देण्यात येणार असल्याचीसुद्धा चर्चा होती. मात्र, यासंदर्भात स्पष्टीकरण देताना गृहमंत्रालयाने पुरस्कारासाठी आलेले सर्वच प्रस्ताव स्वीकारणे बंधनकारक नसल्याचे सांगितले.