पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेला विशेष महत्त्व आहे. वाईटावर चांगल्या गोष्टीचा कायम विजय होतो हा संदेश देणारा नवरात्रोत्सव बंगालमध्ये दरवर्षी अतिशय अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. महाराष्ट्रात गणेशोत्सवात ज्याप्रमाणे देखावे आणि सजावट असते. त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये विविध मंडळांच्या देवींची सजावट कऱण्यात येते. बंगालमध्ये नवरात्रीच्या सहाव्या दिवसापासून सुरु होणारा हा सण दहाव्या दिवशी संपतो. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मोठमोठे मंडप घातले जातात आणि काही संदेश देणारे तर काही दिव्यांचा वापर करुन देखावे साकार केले जातात. हे मंडप नागरिकांना पाहण्यासाठी खुले असल्याने पश्चिम बंगालमधील नागरिक त्याचा आनंद लुटताना दिसतात. एका ठिकाणी देखाव्याच्या प्रवेशव्दारातच दोन अतिशय मोठ्या अशा पौराणिक प्रतिकृती दिसत आहेत. मृत्यू आणि राहू अशी दोन रुपे यामध्ये दाखविण्यात आली आहेत. तुमच्या आयुष्याचे आणि मृत्यूनंतरच्या गोष्टींचा निर्णय हे दोघे देतात असा संदेश यातून देण्यात येत आहे. अतिशय रेखीव असे हे काम मनाला भावणारे आहे. नुकत्याच गाजलेल्या बाहुबली चित्रपटातील माहिष्मतीच्या भव्यदिव्य महालाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. ती पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. याबरोबरच कलकत्त्यातील हिंदुस्तान पार्क सरबोझिन याठिकाणी राक्षसांचे मुखवटे तयार करण्यात आले असून ते दगडामध्ये कोरल्यासारखे दिसत आहेत. मात्र तसे नसून जुने टायर आणि ट्यूब यांचा वापर करुन ते तयार केले आहेत. पर्यावरणाचे संवर्धन आणि टाकाऊतून टिकाऊ हे लक्षात घेत इको-फ्रेंडली पद्धतीने देखाव्यातील सर्व सजावट करण्यात आली आहे. याशिवाय ८ हजार किलो काचेचा वापर करुन अतिशय सुरेख अशी सजावट करुन देवीचा मंडप कोलकात्यातील एका प्रसिद्ध मंडळाने केला आहे. याठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना प्रसन्न वाटेल असे वातावरण आहे. दक्षिण कोलकातामधील हरीदेवपूर आदर्श समिती याठिकाणी 'वेळ' या संकल्पनेवर देखावा करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला नवरात्रीचा वेगळ्या पद्धतीने घ्यायचा असल्यास तुम्ही कोलकातामध्ये जाऊन तो निश्चितच घेऊ शकता.