मुंबईतील नौदलाच्या गोदीमध्ये डागडुजीसाठी आलेल्या आयएनएस बेटवा या युद्धनौकेला समुद्रात सोडताना टेकूवरुन घसरल्याने अपघात झाला आहे. या अपघातात १४ नौसैनिकांची सुटका करण्यात आली असून दोन नौसैनिकांचा यात मृत्यू झाला आहे.

आयएनएस बेटवा ही युद्धनौका भारतीय बनावटीची युद्धनौका आहे. मुंबईतील नौसेनेच्या गोदीत या युद्धनौकेची डागडुजी सुरु होती. सोमवारी दुपारी या युद्धनौकेला पुन्हा समुद्रात सोडताना युद्धनौका टेकूवरुन घसरली. या अपघातात १६ नौसैनिक अडकले होते. यातील १४ जणांची सुटका करण्यात यश आले. तर उर्वरित दोघांचा मृत्यू झाल्याचे नौदलाने सांगितले. तांत्रिक त्रुटींमुळे हा अपघात झाला असून या घटनेची सविस्तर माहिती घेत असल्याचे नौदलाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. नौदल गोदीमध्ये क्रूझर ग्रेव्हिंग गोदीत ही युद्धनौका कलंडल्याचे समजते. अपघातात युद्धनौकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मात्र नौदलाने याविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही.

आयएनएस बेटवा या युद्धनौकेचे वजन ३८०० टन असून २००४ मध्ये ही युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. १२५ मीटर लांब ही युद्धनौका ३० सागरी मैल प्रति तास या वेगाने प्रवास करु शकते. या युद्धनौकेत अत्याधुनिक तंत्रज्ञान असून जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारी मिसाईल आणि मिसाईल हल्लारोधक यंत्रणाही या युद्धनौकेत आहेत.