नक्षलवादी अतिरेक्यांनी बुधवारी दुपारी छत्तीसगढमधील नारायणपूर येथे १६ गावकऱ्यांची निर्घृण हत्या केली. नक्षलवाद्यांनी सांगितलेल्या ‘मार्गदर्शक तत्त्वां’चे पालन न केल्याने हे हत्याकांड घडविल्याचे अतिरेक्यांनी जाहीर केले.
नारायणपूर हा दुर्गम भाग असून दाट जंगलालगत आहे. तिथे पोलिसांचे संख्याबळ अत्यल्प असल्याने नक्षलवाद्यांच्या कारवायांना पायबंद घालण्यात अपयश येत आहे. या हत्याकांडानंतर मात्र राज्य सरकारने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नक्षलवादी अतिरेक्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा राज्याचे गृहमंत्री अजय चंद्रकार यांनी दिला आहे.

२३ जणांची शरणागती
रायपूर : चळवळीत वाढत चाललेला हिंसाचार सहन होत नसल्याचे कारण देत छत्तीसगढमधील बस्तर जिल्ह्य़ात २३ नक्षलवाद्यांनी बुधवारी आत्मसमर्पण केले. यातील तिघांवर प्रत्येकी एक लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते.