छत्तीसगढच्या सुकमा जिल्ह्य़ात नक्षलवाद्यांनी शनिवारी सात पोलिसांना ठार मारल्यानंतर कंकेर जिल्ह्य़ात खाणकाम सुरू असलेल्या भागात रविवारी त्यांनी १७ वाहनांना आगी लावल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र त्यामध्ये कोणालाही इजा झाली नाही.
कोरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरबसपूर येथील खाणक्षेत्रावर माओवादी नक्षलवाद्यांनी हल्ला करून तेथे काम करीत असलेल्या मजुरांना धमकावले आणि नंतर १७ वाहनांना आगी लावल्या. या घटनेनंतर नक्षलवाद्यांनी बाजूच्या जंगलात पलायन केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने तेथे रवाना झाले. तेथे त्यांना भक्ष्यस्थानी पडलेली वाहने सापडली. त्यामध्ये ट्रक, जेसीबी वाहनांचा समावेश होता. या भागात नेको जयस्वाल कंपनीतर्फे खनिजकाम सुरू असून त्यालाच नक्षलवाद्यांचा विरोध आहे.